Wednesday, 2 October 2013

करिअर-1

कामाचे स्वरूप/वातावरण : बातमीदारांना विशिष्ट विषयांवरील वृत्तसंकलन अथवा त्या त्या विषयातील बातमीचा वेध घेण्यासाठी कामाची जबाबदारी दिली जाते. त्याचप्रमाणे बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

विशेष प्रतिनिधी : परदेश, राजकीय, सामाजिक घडामोडी, कोर्ट, क्रीडा अथवा त्या त्या विषयाशी संबंधित शहरातील बातम्या, त्यांचे विश्लेषण करणे इ. जबाबदारी विशेष प्रतिनिधींवर असते. बातमीदार आणि विशेष प्रतिनिधींना अतिशय व्यस्त कामाचे स्वरूप असते. त्यांना ठराविक वेळेतच आपले काम पूर्ण करावे लागते.

स्तंभलेखक : स्तंभलेखकांना नियमितपणाने एका विशिष्ट विषयावर विश्लेषणात्मक लेख लिहावा लागतो.

फिचर रायटर्स : विविध विषयांवर संशोधनात्मक, अभ्यासपूर्ण लेख तयार करणे यासाठी कालमर्यादा असते; परंतु त्यांना पुरेसा वेळ दिला जातो व शब्दमर्यादा निश्चित केली जाते. यात पुस्तक परीक्षणे, चित्रपट अथवा ध्वनिचित्रफीत रसग्रहण, टी.व्ही. आणि रेडिओ प्रश्नेग्रॅम, सीडीज्, ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटस् परीक्षण, वेबसाइटस् इ. अनेक गोष्टींचा समावेश होतो.

उपसंपादक : बातमीदारांनी दिलेल्या बातमीची सत्यासत्यता पडताळणे, संपादन करणे, शक्य असल्यास बातमीचे पुनर्लेखन करणे, बातमीचा मथळा ठरविणे, एखादी बातमी अद्ययावत करणे, आवश्यकता वाटल्यास पानाचा लेआऊट बदलणे इ. स्वरूपाची कामे उपसंपादकांना करावी लागतात.

मुख्य संपादक : धोरणात्मक आणि वृत्तपत्रात/ प्रकाशनात प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराची जबाबदारी सांभाळावी लागते.

मुक्त पत्रकार : मुक्त पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही संस्थेला बांधील नसतात. त्यांना त्यांच्या कामासाठी स्वत:च बाजारपेठ शोधावी लागते.

आवश्यक कौशल्य, दृष्टिकोन : या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडे बहुश्रुतता विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण वाचन, स्वत:चे मत स्पष्ट शब्दात लिहिण्याची क्षमता, एखाद्या घटनेचे विश्लेषण करण्याची क्षमता, प्रसंगी संशोधनात्मक काम करण्याची मनाची तयारी, सामाजिक भान, वेळेचे बंधन पाळण्याची हातोटी, उत्कृष्ट आकलन क्षमता, मातृभाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी तसेच शक्य तितक्या इतर भाषेचे ज्ञान असणे, काम करण्याच्या दृष्टीने सोयीचे जाते


  तील निवडक अभ्यासक्रमांची थोडक्या

१) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन : भारत सरकारच्या इन्फर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील ही एक स्वायत्त संस्था असून या संस्थेत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यम/ जाहिरात विभागात काम करणाऱ्या संपर्क व्यावसायिकांसाठी अल्पावधीचे प्रशिक्षणवर्ग आहेत. शिवाय वर्षातून दोन वेळा या अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. या संस्थेमध्ये ओरिएन्टेशन कोर्स फॉर ऑफिसर्स ऑफ दि इंडियन इन्फर्मेशन सव्‍‌र्हिस, ब्रॉडकास्ट जर्नालिझम कोर्स फॉर पर्सोनेल ऑफ आकाशवाणी आणि दूरदर्शन आणि डिप्लोमा कोर्स इन न्यूज एजन्सी जर्नालिझम फॉर नॉनअलाइज्ड कंट्रीज असे तीन अभ्यासक्रम राबविले जातात. शिवाय पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन जर्नालिझम हा अभ्यासक्रम सर्व पदवीधारकांसाठी खुला आहे. यांची माध्यमे इंग्रजी आणि हिंदी आहेत. त्याव्यतिरिक्त डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स हा एक कोर्स आहे. या सर्वाचा कालावधी आठ महिने आहे. परीक्षा आणि मुलाखत दिल्ली मुक्कामी देऊन प्रवेश घ्यावा लागतो. मागणीनुसार परीक्षा केंद्र मुंबईमध्ये येते. फ्रीशिप्स आणि शिष्यवृत्त्या आहेत. संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अरुणा असफअली मार्ग, नवी दिल्ली- ११००६७.

२) मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर, जमिया मिलिया इस्लामिया, जमियानगर, नवी दिल्ली- ११००२५ कोर्स : एम. ए. (मास कम्युनिकेशन) कालावधी : दोन वर्षे प्रवेशपात्रता : पदवीधर

३) डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिटय़ूट, फग्र्युसन कॉलेज रस्ता, पुणे- ४११००४ प्रवेशपात्रता : पदवीधर कालावधी : एक वर्ष जर्नालिझम (मराठी) कालावधी : सहा महिने प्रवेशपात्रता : बारावी पास (इंग्रजीसह)

४) गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करियर एज्युकेशन, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ, मुंबई- ४०००९८. कालावधी : एक वर्षाचा अंशकालीन पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशपात्रता : पदवीधर

५) एस. एन. डी. टी. वुमेन्स युनिव्हर्सिटी, पाटकर मार्ग, चर्चगेट, मुंबई- २१. कोर्स : जर्नालिझम (मराठी)

६) एम. आय. टी. स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज, १२४, पौड रोड, कोथरूड, पुणे- ४११०३८ एक वर्षाचा अंशकालीन डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड कम्युनिकेशन्स मॅनेजमेंट प्रवेशपात्रता : पदवीधर

७) मुंबई मराठी पत्रकार संघ : संघाच्या वतीने मराठी भाषेत पदविका (पदवीधरांसाठी) आणि प्रमाणपत्र (बारावी उत्तीर्णांसाठी)अभ्यासक्रम चालविण्यात येतात. यंदाचे अभ्यासवर्गाचे १०वे वर्ष असून १३ ऑगस्टपासून हे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. दर गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत चालणाऱ्या या अभ्यासवर्गांना ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शन करतात. अधिक माहितीसाठी, पत्रकार भवन, मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, महापालिका मार्ग येथे प्रत्यक्ष किंवा २२६२०४५१, २२७०४१८९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन या विषयात अंशकालीन पदविका देणाऱ्या मुंबईतील काही संस्था :

८) भारतीय विद्याभवन चौपाटी, मुंबई- ४००००७.

९) बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालिझम,

के. सी. कॉलेज इमारत, चर्चगेट, मुबई- ४०००२०.

१०) बॉम्बे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, दिनशा वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०.

११) देहली इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड सव्‍‌र्हिसेस २६३, दादाभाई नवरोजी मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१.

१२) हरकिसन मेहता फाऊंडेशन इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नालिझम,

नरसी-मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स, विलेपार्ले, मुंबई

१३) हॉर्निमन कॉलेज ऑफ जर्नालिझम, माटुंगा, मुंबई

१४) मराठी वृत्तपत्र लेखक संघ, शिंदेवाडी, पालन मार्ग, दादर, मुंबई- ४०००१४.

१५) सेंट झेविअर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई- १.

१६) सोफिया कॉलेज (बी. के. सोमाणी पॉलिटेक्निक) भुलाभाई देसाई रोड, मुंबई- ४०००२६.

१७) सोमैया इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नालिझम अँड मास कम्यु. विद्याविहार, मुंबई- ४०००७७.

१८) सिद्धार्थ कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन, आनंद भवन, दादाभाई नवरोजी मार्ग, मुंबई- ४००००१.

१९) पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड प्रश्नेफेशनल स्टडीज.

२०)मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई- ४०००८०.







पहिला वृत्तपत्र आयोग

(प्रेस कमिशन इन् इंडिया). वृत्तपत्र व्यवसायासंबंधी पाहणी व अभ्यास करुन शिफारशी करण्याकरिता ‘वृत्तपत्र आयोग’ नेमण्याचा प्रघात ग्रेट ब्रिटन, अमेरिका यांसारख्या लोकशाहीवादी देशांनी सुरु केला. ग्रेट ब्रिटन मध्ये ‘रॉयल प्रेस कमिशन’ हा वृत्तपत्र आयोग १९४५ मध्ये स्थापन झाला. अमेरिकेत रॉबर्ट एम्. हचिन्स (१८९९–१९७७ ) या शिक्षणतज्ज्ञाने ‘कमिशन ऑन फ्रिडम ऑफ द प्रेस’ या वृत्तपत्र आयोगाचे नेतृत्व केले (१९४६).
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील वृत्तपत्राच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी ब्रिटीश ‘रॉयल प्रेस कमिशन’ च्या धर्तीवर आयोग नेमण्यात यावा, अशी मागणी करण्यात येऊ लागली. अखिल भारतीय वृत्तपत्र संपादक परिषद आणि भारतीय श्रमिक पत्रकार महासंघ यांनी ही मागणी विशेषत्वाने उचलुन धरली.

पहिला वृत्तपत्र आयोग :
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ग. स. राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली २२ सप्टेंबर १९५२ रोजी पहिल्या वृत्त्पत्र आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यात सी. पी. रामस्वामी अय्यर, आचार्य नरेंद्र देव, झाकिर हुसेन, पु. ह. पटवर्धन, आ. रा. भट, चलपती राव, आणि ए. डी. मणी इ. सभासद होते.
आयोगाने विचारात घ्यावयाचे मुद्दे पुढील प्रमाणे होते: वृत्तपत्राच्या निंयत्रणाचे स्वरुप आणि त्यांची आर्थिक रचना, मक्तेदारी, आणि साखळी- वृत्तपत्रे, बातम्यांचा अचुकपणा आणि नि:पक्षपातीपणा, जाहिरतींचे वितरण, निकोप पत्रकारितेचा विकास, उच्च व्यावसायिक मृल्यांचे जतन, श्रमिक पत्रकारांच्या कामाची परिस्थिती, वेतन, प्रशिक्षण, वृत्तपत्रीय कागदाचा पुरवठा, शासन आणि वृत्तपत्रे यांतील परस्पर संबंध, वृत्तपत्रस्वांतत्र्य आणि त्यासंबधीचे कायदे इत्यादी.
आयोगाने १४ जुलै १९५४ रोजी आपला अहवाल लिहून पूर्ण केला. या अहवालाचे एकुण तीन भाग आहेत : पहिल्या भागात वृत्तपत्रविषयक प्रमुख शिफारशी आहेत. दुसऱ्या भागात भारतीय पत्रकारितेचा इतिहास दिला आहे आणि तिसऱ्या भागात आयोगाच्या कामकाजाचे तपशील देण्यात आले आहेत. या अहवालाचे वर्णन आयोगाचे सदस्य व प्रसिद्ध पत्रकार ⇨चलपती राव यांनी ‘अ काइंड ऑफ बायबल’ (वृत्तपत्र व्यवसायाचा पवित्र ग्रंथ या अर्थी) असे केले आहे.
या आयोगाने वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि पत्रकारांकरिता आचारसंहिता तयार करण्यासाठी वृत्तपत्र समितीची (प्रेस काउन्सिल) स्थापन करण्यात यावी. अशी शिफारस केली. त्यानुसार वृत्तपत्र समिती कायदा संमत होऊन (१९६५), ४ जुलै १९६६ रोजी पहिली वृत्तपत्र समिती स्थापन करण्यात आली. वृत्तपत्र निबंधकाची (प्रेस रजिस्ट्र्रार) नेमणूक करण्यात यावी. या सुचनेची दखल घेउन शासनाने १ जुलै १९५६ पासून ते पद निर्माण केले.
आयोगाच्या कामाची महत्वाची फलश्रुती म्हणून १९५५ चा श्रमिक पत्रकार कायदा आणि वेतन मंडळाची स्थापना या बाबींचा निर्देश करता येईल. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये वेतन अधिक असले तरी देशी भाषांतील वृत्तपत्रकाराची स्थिती मात्र हलाखीची होती. त्यामुळे पत्रकारांना किमान रू. १२५ मासिक वेतन द्यावे. त्याच्या भविष्यनिर्वाह निधीची व उपदान निधीची (ग्रॅच्युइटी) तरतुद असावी, तसेच महागाई भत्ता आणि शहर भत्ता देण्यात यावा अशा सूचनाही आयोगाने केल्या. श्रमिक पत्रकारांच्या कामगार संघटनांनी राजकीय पक्ष व आंदोलने यांपासुन कटाक्षाने दुर रहावे, असा इशारा आयोगाने दिला.
कमी खपाच्या लहान वर्तमानपत्रांना गुंतवणुकीच्या जेमतेम एक टक्का नफा होत असे. मोठ्या वर्तमानपत्राच्या बाबतींत हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत जात असे. मक्तेदारी आणि साखळी-वृत्तपत्रांचे प्रमाण जास्त होते. अशा वृत्तपत्रांशी स्पर्धा करणे एकट्या व स्वतंत्र वृत्तपत्रांना जड जाई. त्यांमुळे मालकी वृत्तपत्रांऐवजी विश्वस्त संस्थेच्या वतीने वृत्तपत्रे चालवण्याची योजणा आयोगाने मांडली. सर्वसाधारणपणे बँकेकडून जेवढे व्याज मिळेल, त्यापेक्षा अवाजवी नफा गुंतवणुकीवर मिळवण्याचा प्रयत्न वृत्तपत्रांनी करू नये, अशी आयोगाची भूमिका होती. धंदा म्हणून वृत्तपत्रांकडे न पाहता लोकशिक्षणाचे साधन म्हणून सामाजिक हिताच्या व जबाबदारीच्या जाणिवेतून वृत्तपत्रे चालवली जावीत, असे आयोगाचे आग्रही प्रतिपादन होते.
साखळी–वृत्तपत्रांपैकी प्रत्येक वृत्तपत्र स्वतंत्र असावे, एकाच वृत्तपत्राच्या अनेक आवृत्त्या असतील तर त्यांचे हिशोब स्वतंत्र असावेत, असे आयोगाने सुचविले.
विषम स्पर्धा टाळण्यासाठी पृष्ठ-किंमत कोष्टक ठरवण्याची आयोग़ाची सूचना केंद्र शासनाने कायदेशीर तरतूद करुन अमंलात आणली. या निर्बंधाच्या विरोधात पुण्याच्या सकाळ वृत्तपत्राने याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने सकाळच्या बाजूने निकाल दिल्याने हा निर्बंध प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
लहान शहरातील व ग्रामीण भागांतील वृत्तपत्रांना उत्तेजन देण्यासाठी शासकीय जाहिराती देताना याच वृत्तपत्रांचा प्रामुख्याने विचार केला जावा, ही आयोगाची शिफारस महत्वाची होती. त्याचबरोबर वृत्तपत्रांच्या एकूण मजकुरातील जाहिरातींचे प्रमाण ४० टक्क्यांहून जास्त नसावे, असे आयोगाचे मत होते.
स्वातंत्र्योत्तर काळात वृत्तपत्र-संपादकांच्या स्वातंत्र्यात आणि दर्जात घसरण होत असल्याची नोंद आयोगाने केली. स्वत:च्या मालकीच्या वृत्तपत्रांतुन आपला दृष्टिकोन प्रकट होइल अशी अपेक्षा करणे हा वृत्तपत्रचालकांचा हक्क आहे. हे आयोगाने मान्य केले. परंतु संपादकाची नेमणूक करतेवेळीच वृत्तपत्राचे धोरण शक्य तितक्या नि:संदिग्ध शब्दांत स्पष्ट करावे, व तसा संपादकाशी करार करावा आणि त्यानंतर मात्र संपादनाचे संपूर्ण अधिकार संपादकाच्या हाती असावेत, असे आयोगाने सुचविले. करारांतील मुद्यांच्या अर्थाविषयी मतभेद झाल्यास त्यांचा निवाडा वृत्तपत्र समितीने करावा, असेही आयोगाने सुचविले.
वृत्तपत्र कागदाच्या पुरवठयासाठी राज्य व्यापार निगमाची स्थापना करावी, जिल्हास्तरावर वृत्तपत्रे स्थापन करवीत, वृत्तसंस्था शासकीय मालकीच्या किंवा शासकीय नियंत्रणाखली असु नयेत, पत्रकारितेच्या औपचारिक शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवावे इ. शिफारशी आयोगाने केल्या. (विश्वकोश)

नानासाहेब भिकाजी परुळेकर

नारायण ऊर्फ नानासाहेब भिकाजी परुळेकर
डॉ. नारायण भिकाजी परुळेकर, ऊर्फ नानासाहेब परुळेकर, (सप्टेंबर २०, इ.स. १८९७ - जानेवारी ८, इ.स. १९७३) हे 'सकाळ'चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले होते.
'निरोप घेता' नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.
इ.स. १९२९ साली नानासाहेब अमेरिकेतील आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. दहा वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यात त्यांनी तेथील पत्रकारिता जवळून अनुभवली. फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन वृत्तपत्रांसाठी त्यांनी वार्तांकनाचे काम केले. आधुनिक पत्रकारिता, वाचकाभिमुख दैनिक, आपला वाचक वर्ग, दैनिकाचे स्वरूप या संबंधीचे त्यांचे आडाखे याच काळात निश्चित झाले.
नानासाहेबांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’ या दैनिकाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर मराठी वृत्तपत्रांनी कात टाकली. खरे तर भारतात परतल्यावर तेव्हा सुरू असलेल्या स्वातंत्र्यचळवळीत उडी घ्यायचा विचारही त्यांच्या मनात होता; पण पत्रकारितेकडे वळाण्याची काही खास कारणे होती. आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकशिक्षणासाठी झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती, आणि वृत्तपत्र माध्यम हे त्यासाठी प्रभावी माध्यम होते. दुसरे म्हणजे लोकमान्य टिळकांचे जीवन आणि कार्य हे नानासाहेबांचे आदर्श होते. लोकमान्यांनी देशसेवेला दिलेले प्राधान्य आणि 'केसरी'मार्फत केलेले लोकजागृतीचे कार्य यांचा नानासाहेबांवर प्रभाव होता. त्यांचा पिंड हा सत्याग्रहीपेक्षा एका पत्रकाराचा होता. त्यामुळे नानासाहेबांची पत्रकारिताच करण्याचे निश्चित केले.
नानासाहेब भारतात परतले तो काळ राजकीय अस्थिरतेबरोबर आर्थिक मंदीचाही होता. नवीन व्यवसाय सुरू करायला वातावरण अजिबात अनुकूल नव्हते. मात्र अशा परिस्थितीला न जुमानता नानासाहेबांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यांना मराठीपेक्षा इंग्रजी लिखाणाचा चांगला सराव होता. त्या वेळी मराठी वृत्तपत्रांपेक्षा इंग्रजी वृत्तपत्रांची चलती होती. इंग्रजीला सरकारदरबारीही महत्त्व होते. मराठी दैनिकांची अवस्था फारच बिकट होती. त्यामुळे नानासाहेबांनी जेव्हा आपला मराठी दैनिक सुरू करण्याचा मनोदय बोलून दाखवला, त्या वेळी तात्यासाहेब केळकरांपासून अनेक नामवंतांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. नानासाहेब मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते; कारण स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांचे महत्त्व त्यांनी परदेशात असतानाच ओळखले होते. समाजातील मोठ्या वर्गाशी संवाद साधायचा असेल, तर प्रादेशिक भाषेशिवाय पर्याय नाही याचीही त्यांना जाण होती.
दैनिक काढण्यामागची नानासाहेबांची भूमिका खूप वेगळी होती. त्यांना वृत्तपत्राचे स्वरूप अधिकाधिक खुले करायचे होते. समाजातील सर्व स्तरांना त्यात सामावून घ्यायचे होते. आपल्या वृत्तपत्राने एखाद्या विषयाची तात्त्विक चर्चा न करता, त्यावर बोजड भाषेत लेख न लिहिता, आसपास घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांचा मागोवा घ्यावा अशी त्यांची भूमिका होती. असे केल्याने ते दैनिक अधिक वाचकाभिमुख होणार होते आणि ते वाचकाभिमुख झाले तरच आगामी काळात तगणार होते.
नानासाहेबांनी प्रत्यक्ष दैनिक सुरू करण्यापूर्वी त्या वेळच्या दैनिकांचा अभ्यास केला. त्याचा वाचकवर्ग कमी का हे तपासून पाहिले. त्यांना असे दिसून आले की, वाचकांना तपशीलवार तर सोडाच, ताज्या बातम्याही मिळत नाहीत. मग त्यांनी एक परिपूर्ण मराठी दैनिक कसे देता येईल याचा विचार सुरू केला.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना मराठी दैनिक यशस्वी करून दाखवायचे होते. तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या नानासाहेबांच्या उद्देशाला हा हेतू पूरकच होता. वृत्तपत्र सुरू करताना पारंपरिक वाचकवर्गाकडे न वळता ते नवीन वाचकवर्ग तयार करण्याच्या कामी लागले. त्यासाठी धोरण आखतानाच त्यांनी वृत्तपत्राचे स्वरूप वार्ताभिमुख ठेवले. दैनिक वृत्तपत्रात बातमीला किती महत्त्व आहे याचा अनुभव नानासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे आपल्या वृत्तपत्राला त्यांनी प्रथम मतपत्राच्या रिंगणातून बाहेर काढले. वाचकांना ताज्या बातम्या देणे, केवळ राजकीय बातम्यांना प्राधान्य न देता शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बातम्यांनाही स्थान देणे; शहरातील विविध कार्यक्रमांचे वृत्तान्त; न्यायालये, पोलीस कचेऱ्या येथून बातम्या मिळवणे यांवर नानासाहेबांनी भर दिला. ग्रामीण भागातील बातम्या मिळवण्यासाठी त्या भागांमध्ये वार्ताहर नेमले. मुंबई हे घटनांचे केंद्रस्थान आहे हे जाणून तिथे खास प्रतिनिधीची नेमणूक केली. वृत्तपत्राचे स्वरूप बदलताना नानासाहेबांनी त्याच्या रचनेत, मांडणीत आणि भाषेतही मूलभूत बदल केले. साध्या, सोप्या आणि सुबोध भाषेचा वापर सुरू केला. बातमीबरोबर छायाचित्र देण्याचा पायंडा पाडला. वृत्तपत्रात दिवसभरातील अधिकाधिक बातम्यांना स्थान मिळावे म्हणून नानासाहेबांनीच प्रथम रात्रपाळी सुरू केली. थोडक्यात, आजच्या पत्रकारितेत पाळली जाणारी सर्व मूलभूत धोरणे नानासाहेबांनी त्या काळी निश्चित केली. आजची पत्रकारिता ही अशाप्रकारे नानासाहेबांच्या पत्रकारितेच्या विचारांवर उभी राहिली.
उत्तरोत्तर प्रगती करताना त्यांच्या 'सकाळ'ने जीवनाच्या विविधांगांनाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परदेशांतील निवडणुका, ऑलिम्पिक सामने, घोड्यांच्या शर्यती, बाजार, ललित कला, संगीत, कीर्तनप्रचार सभा, नाट्यवाचन, ग्रंथपुरस्कार यासंबंधीच्या बातम्यांमुळे `सकाळ' लवकरच सर्वसामान्यांपासून ते बौद्धिक जीवन जगणाऱ्या प्रत्येकाचा मित्र झाला.
सुरूवातीला कुठल्याच भांडवलाचे पाठबळ नानासाहेबांना नव्हते. त्यांनी कुठल्याच राजकीय पक्षाची किंवा मतप्रवाहाची बांधिलकी मानली नाही; त्यामुळे तिकडूनही मदत येण्याची शक्यता नव्हती. काही स्नेहीजनांनी मदतीचा हात पुढे केला, तरी त्यांना मोठ्या रकमेचे कर्ज घ्यावे लागले. केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’ चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे त्यांना खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागले. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोके वर काढत. नानासाहेब या सर्वांना पुरून उरले. सचोटीने व्यवहार करून त्यांनी ‘सकाळ’ ला यशाचा मार्ग दाखवला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग आपला व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी केला.
'सकाळ' सुरू केल्यानंतर वर्षभरातच नानासाहेबांनी ‘साप्ताहिक सकाळ’ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले आणि त्यानंतर काही दिवसांतच ‘तेज’ नावाचे एक कमी किंमतीचे दैनिकही सुरू केले. एकदा पुण्यातील वृत्तपत्रे मार्गी लावल्यावर मुंबईमध्येही वृत्तपत्र सुरू करण्याचे विचार नानासहेबांच्या डोक्यात घोळू लागले.
मुंबईतील दैनिकाचा विचार पक्का होताच नानासाहेबांनी २१ मार्च, इ.स. १९३६ रोजी ‘स्वराज्य’ दैनिक सुरू केले. पुढे ‘स्वराज्य’ चे दैनिक स्वरूप बदलून ते साप्ताहिक करण्यात आले आणि कालांतराने तर त्याची मुंबईतूनही उचलबांगडी झाली. ‘तेज’ दैनिक तर बंद पडलेच पण ‘सकाळ’लाही आर्थिक तूट भरून काढावी लागली. नानासाहेबांना तीस-चाळीस खटल्यांना तोंड द्यावे लागले; मानसिक क्लेशही सहन करावे लागले. पुण्यातील रूढीप्रिय, परंपरावादी गटाला नानासाहेबांची मुक्त धोरणे आवडत नव्हती. त्याबद्दल ते नानासाहेबांची टवाळीही करीत असत. या अपयशामुळे नानासाहेबांना त्यांचा रोषही सहन करावा लागला.
नानासाहेबांनी त्या काळात कुठलेही पाठबळ नसताना वृत्तपत्र व्यवसायात पाऊल ठेवले आणि ते यशस्वी करून दाखवले. अपयश हा अनुभवातून शिकण्याचा एक टप्पा आहे असे मानून त्यांनी नव्याने व्यवसायाची नौका हाकारली; म्हणूनच त्यांचे नाव आज यशस्वी संपादकांच्या मांदियाळीत घेतले जाते.
पत्रकारितेच्या क्षेत्रात एका गोष्टीने नानासाहेबांना तारून नेले आणि ती म्हणजे त्यांची व्यावसायिकता! त्यांनी पत्रकारितेला समाजसेवेचे साधन मानले, तरी त्यात व्यावसायिकता आणली. त्याचबरोबर धंदेवाईकपणा दूर ठेवला. बांधावरच्या शेतमजुरालाही त्याच्या अस्तित्वाशी निगडित बातम्या पुरवून त्यांनी आपले दैनिक सर्वव्यापी केले. ते स्वतः वृत्तपत्राचे चालक, मालक, व्यवस्थापक आणि संपादक होतेच, पण आपला वृत्तसंपादकाचा बाणा त्यांनी कायम जागता ठेवला. आलेली प्रत्येक बातमी डोळ्यात तेल घालून तपासली आणि बातमीदारांमध्ये बातम्यांसंदर्भातली विशेष जाण विकसित केली. नानासाहेब हे यशस्वी संपादक तर होतेच, पण काळाची पावले ओळखून वृत्तपत्रात व्यावसायिक बदल करणारे, त्यातील अनावश्यक भोंगळपणा आणि वृथा आदर्शवाद निपटून काढून वृत्तपत्राला कालसुसंगत तोंडवळा बहाल करणारे एक क्रांतिकारी पत्रकार होते.

वृत्तपत्रविद्या

वृत्तपत्रविद्या : (जर्नॅलिझम, स्टडी ऑफ). वृत्त किंवा वार्ता हा वृत्तपत्राचा केंद्रबिंदू असल्याने वार्तेचे स्वरुप, मूल्ये, संकलन, लेखन, संपादन, विश्लेषण, टिकाटिपण्णी या विषयांचा वृत्तपत्रविद्येत प्रामुख्याने समावेश होतो. म्हणूनच केसरीचे संपादक थोर साहित्यिक न. चिं. केळकर (१८७२-१९४९) त्याला ‘संपादकीय शिक्षण’ असे म्हणत. याशिवाय वृत्तपत्राशी संबंधित असलेले इतर विषय म्हणजे मुद्रण, वृत्तपत्राचे तत्त्वज्ञान, वृत्तपत्रविषयक कायदे, ताज्या घडामोडी, जाहिरात, जनसंपर्क, तसेच नभोवाणी, दूरचित्रवाणी, चित्रपट इ. जनसंज्ञापन-माध्यमे यांचाही वृत्तपत्रविद्येत समावेश करण्यात येतो. मात्र एक किंवा दोन वर्षांच्या मर्यादित कालावधीत या सर्व विषयांचे सखोल ज्ञान देणे अशक्य असल्याने वृत्तपत्रविद्येच्या अभ्यासक्रमात तांत्रिक कौशल्ये व तत्वज्ञान यांना प्राधान्य देऊन इतर विषयांची साधारणपणे तोंडओळख करुन दिली जाते. वृत्तपत्रविद्येला एक शैक्षणिक विषय म्हणून म्हणून मान्यता मिळाली आहे.

जागतिक आढावा : () भारत : वृत्तपत्रविद्येचे प्रशिक्षण देण्याचे सुरुवातीचे प्रयत्न पुणे व चेन्नई येथे झाले. १९२१ साली असहकारितेच्या चळवळीत उडी घेऊन शाळा-महाविद्यालयांतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र धंद्याचे शिक्षण देण्याकरिता केसरी-मराठा संस्थेने पुणे येथील गायकवाड वाड्यात संपादकीय शिक्षणाचा एक वर्ग काढून खर्च करुन एक वर्ष चालविला. या वर्गातून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे वर्तमानपत्राचा धंदा केला व हैदराबाद, सोलापूर, जळगाव, सातारा वगैरे ठिकाणी त्यांनी वर्तमानपत्रे चालविली, असे न. चिं. केळकरांनी वृत्तपत्रमीमांसा (१९६५ – पृ. १३४) या पुस्तकात म्हटले आहे. चेन्नईतील अड्यारच्या राष्ट्रीय विद्यापीठातील इंग्लिश विभागामध्ये डॉ. अॅनी बेझंट यांनी वृत्तपत्रविद्येचे प्रशिक्षण देण्यास १९२०-२१मध्ये सुरुवात केली. हा उपक्रम सु, पाच वर्षे चालला. वृत्तपत्रातील कार्यानुभव हा या अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग होता आणि त्यातून सु. २५ विद्यार्थी प्रशिक्षत झाले, अशी माहिती या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेले एक विद्यार्थी व साध्वीचे संपादक आगाराम रंगय्या यांनी आपल्याला दिली अशे नोंद प्रा. नाडिग कृष्णमूर्ती यांनी केली आहे (इंडियन जर्नॅलिझम, १९६६). विद्यापीठ पातळीवर वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा पहिला मान अलिगढ मुस्लिम विद्यापीठाकडे जातो. १९३८ मध्ये सुरु झालेला हा अभ्यासक्रम शिकविणारे प्राध्यापक रहमली अल् हाश्मी यांचे वरिष्ठांशी मतभेद झाल्यामुळे तो १९४० मध्ये बंद झाला.

भारतात वृत्तपत्रविद्येचा खरा पाया घातला प्रा. पृथ्वीपालसिंग यांनी. लाहोर (सध्या पाकिस्तानात) येथील ⇨पंजाब विद्यापीठात त्यांनी १९४१ मध्ये वृत्तपत्रविद्येचा सायंकालीन अंशवेळ पदविका अभ्यासक्रम सुरु केला. त्यांनी स्वतः ‘लंडन पॉलिटेक्निक’ मधून पदविका आणि मिसूरी विद्यापीठातून ‘मास्टर्स’ ही पदवी मिळवली होती. त्यामुळे भारतातील वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणापुढे अगदी प्रारंभापासून त्या दोन भिन्न प्रणालींचे आदर्श होते. त्यापैंकी ब्रिटिश प्रणाली फक्त पत्रकारितेच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणारी, प्रात्यक्षिक कार्यानुभवावर भर देणारी आणि मनुष्यबळ व निधी यांच्या मर्यादित गुंतवणूकीवर आधारलेली होती. त्यामुळे व सर्व ब्रिटिश गोष्टींना आदर्श मानण्याच्या तत्कालीन प्रवृत्तीमुळे भारतीय विद्यापीठांनी प्रारंभीच्या दोन-तीन दशकांत ब्रिटिश प्रणालीचे अनुकरण केले. १९७० नंतर अमेरिकी धर्तीवर दोन वर्षांचे ‘मास्टर’ या पदवी अभ्यासक्रमात झाले आहे. मद्रास विद्यापीठाने १९४७मध्ये अर्थशास्त्र विभागांतर्गत वृत्तपत्रविद्येचा पदविका अभ्यासक्रम सुरु केला. १९७५ मध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन होऊन तेथे दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु झाला. १९७९ मध्ये त्याची जागा दोन वर्षांच्या एम्. ए. (संज्ञापन) या अभ्यासक्रमाने घेतली. नागपूरच्या हिस्लॉप ख्रिश्चन (सध्याचे विदर्भ महाविद्यालय) महाविद्यालयाने १९५२ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेल्यांसाठी पदविका अभ्यासक्रम सुरु केला. १९६४ मध्ये त्या अभ्यासक्रमाचे रुपांतर ‘बॅचलर’ पदवी अभ्यासक्रमात झाले. पण शिक्षकांच्या अभावी हा अभ्यासक्रम १९६६मध्ये बंद पडला. नागपूर विद्यापीठाने १९६९ मध्ये त्याचे पुनरुज्जीवन केले. कोलकाता विद्यापीठानेही १९५० मध्ये सुरु केलेल्या दोन वर्षांच्या अंशकालीन अभ्यासक्रमाचे १९७१ मध्ये ‘मास्टर्स’ पदवी अभ्यासक्रमात रुपांतर केले. म्हैसूरच्या महाराजा महाविद्यालयाने बी. ए. च्या अभ्यासक्रमात वृत्तपत्रविद्येचा ऐच्छिक विषय म्हणून समावेश केला. १९५९ मध्ये बी. ए. च्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात वृत्तपत्रविद्या हा मुख्य विषय म्हणून मान्य करण्यात आला. म्हैसूर विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा स्वतंत्र विभाग १९६९ मध्ये सुरु केला. तेथे तेव्हापासून दोन वर्षांचा ‘मास्टर’ पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आता बंगलोर विद्यापीठाने व अन्य काही विद्यापीठांनीही बॅचलर पदवी अभ्यासक्रमात पत्रकारिता व जनसंज्ञापन या विषयांचा समावेश केला आहे. भारतात सु. साठ विद्यापीठांमध्ये वृत्तपत्रविद्येचे शिक्षण दिले जाते.

पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाची स्थापना १९६४ मध्ये झाली. प्रारंभी दोन वर्षांचा अंशकालीन पदविका अभ्यासक्रम, १९६८ पासून एक वर्षाचा पूर्ण वेळ पदविका अभ्यासक्रम, १९७४ पासून एक वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आणि १९९३ पासून एक वर्षाचा ‘मास्टर’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम अशी प्रगती होत होत आता तेथे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि मास्टर या पदवीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम असे तीन अभ्यासक्रम चालविले जातात. यांशिवाय पुणे विद्यापीठात १९९० नंतरच्या दशकात संज्ञापनविद्या हा वेगळा विभाग सुरु झाला. तेथेही दोन वर्षांचा संज्ञापनविद्येतील ‘मास्टर’ या पदवीचा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. वृत्तपत्रविद्येमध्ये पुणे विद्यापीठाने आतापर्यंत तीन पीएच्. डी. पदव्याही प्रदान केल्या आहेत.

रंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ येथे वृत्तपत्रविद्येचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यांच्या क्षेत्रांतील काही महाविद्यालयांमध्ये वृत्तपत्रविद्येचे अभ्यासक्रम चालविले जातात. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठामध्ये वृत्तपत्रविद्येचे अल्पकालीन व अंशकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात.

भारत सरकारने १९६५ मध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ ची स्थापना केली. तेथे केंद्राच्या व राज्यांच्या कक्षेतील अधिकार्यां ना वृत्तपत्रविद्या व जनसंपर्क यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. शिवाय त्या संस्थेमध्ये वृत्तपत्रविद्येचा एक वर्षाचा पदव्युत्तर-पदविका अभ्यासक्रम, आकाशवाणी व दूरचित्रवाणी-पत्रकरिता आणि जाहिरात असे प्रत्येक एक वर्षाचे चार पदविका अभ्यासक्रम इंग्लिश व हिंदी या माध्यमांतून चालविले जातात. त्यांपैकी वृत्तपत्रविद्येच्या व वृत्तसंस्था-पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांत आशिया व आफ्रिका खंडातील विकसनशील राष्ट्रांच्या उमेदवारांसाठी ५०% जागा राखीव ठेवलेल्या असतात. अध्यापकवर्ग, इमारत, यंत्रसामग्री आणि निधी या दृष्टींनी भारतातील ही एक समृद्ध संस्था आहे. आता तिची धेनकानाल (ओरिसा) व कोट्टयम् (केरळ) अशी दोन प्रादेशिक केंद्रे सुरु झाली असून, मध्य प्रदेशातील झाबुआ येथे आणि नागालँड दिमापूर येथे केंद्रे सुरु करण्याची संस्थेची योजना आहे. पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ या संस्थेमध्ये दूरचित्रवाणी पत्रकारितेचे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते.

वृत्तपत्रविद्येसाठी मध्य प्रदेश शासनाने भोपाळ येथे ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विश्वविद्यालय’ स्थापन केले (१९९१).

भारतात अनेक खाजगी संस्थांमध्येही वृत्तपत्रविद्येचे शिक्षण दिले जाते. त्यांमध्ये भारतीय विद्याभवनाची सु. २० केंद्रे, ‘सेंट झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन’ (मुंबई), ‘मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड अॅडव्हरटायझिंग’ (अहमदाबाद), ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नॅलिझम’ (बंगलोर), ‘मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन’ (मणिपाल) आणि ‘सिंबॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन’ (पुणे) यांचा उल्लेख करावा लागेल. यांशिवाय मुंबईतील किसनदास चेलाराम महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, सोफिया महाविद्यालय यांसारखी खाजगी महाविद्यालये वृत्तपत्रविद्येचे अंशकालीन अभ्यासक्रम चालवितात. केरळ, म्हैसूर व जयपूर या विद्यापीठांतर्फे टपालाद्वारेही वृत्तपत्रविद्येचे शिक्षण दिले जाते.

वृत्तपत्रविद्येच्या प्रमाणभूत अभ्यासक्रमांत पुढील विषयांचा अंतरभाव असतो : () वृत्तसंकलन, वृत्तलेखन, वृत्तसंपादन. () संपादकीय लेखन, वृत्तपत्रे व नियतकालिके यांचे संपादन, पानांची रचना () छायाचित्र-पत्रकारिता. () वृत्तपत्रांचे तत्वज्ञान. () वृत्तपत्रविषयक कायदे, भारतीय राज्यघटना. () भारतातील वृत्तपत्रांचा (=पत्रकारितेचा) इतिहास, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास. () चालू घडामोडी-आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक. () संज्ञापनाचे सिद्धांत, आंतरव्यक्ती संज्ञापन, जनसंज्ञापन. () भारतातील नभोवाणी व दूरचित्रवाणी यांचा विकास. (१०) नभोवाणी/दूरचित्रवाणीसाठी पत्रकारिता. (११) भाषालेखन कौशल्ये. (१२) संशोधनपद्धती. (१३)प्रादेशिक भाषेतील पत्रकारिता, प्रदेशाचा इतिहास.

() अमेरिका : वॉशिंग्टन विद्यापीठाने १८६९ मध्ये पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याला फक्त जोसेफ पुलिट्झर (न्यूयॉर्क वर्ल्ड) आणि व्हाइट लॉ रीड (‘ट्रिब्यून’) या दोनच संपादकांचा पाठिंबा होता. मिसूरी विद्यापीठाने १८७८ मध्ये पत्रकारितेचा ‘इतिहास-साधने’ याचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. तेथेच १९०८ मध्ये पत्रकारितेचे पहिले स्वतंत्र ‘स्कूल’ सुरु झाले. जोसेफ पुलिट्झरने दिलेल्या देणगीमुळे कोलंबिया विद्यापीठाने (न्यूयॉर्क) पत्रकारितेची कौशल्ये व कार्यानुभव देणारे ‘स्कूल’ १९१२ मध्ये सुरु केले. पत्रकारितेच्या विभागांची अमेरिकी विद्यापीठातील संख्या  (१९१०) वरुन ८४(१९१७), ४५५ (१९३४) व ६०० (१९८७) अशी वेगाने वाढत गेली. अमेरिकेतील पत्रकारितेच्या शिक्षणाचे प्रमाणीकरण करण्यात ‘अमेरिकेन असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ जर्नॅलिझम’ (१९१२), ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ स्कूल्स अँड डिपार्टमेंट्स ऑफ जर्नॅलिझम’ (१९१७), ‘अमेरिकन काउन्सिल फॉर एज्युकेशन इन जर्नॅलिझम’ (१९३९) आणि ‘अमेरिकन सोसायटी ऑफ जर्नॅलिझम अँड स्कूल जर्नॅलिझम’ (१९४४) इ. संस्थांनी आणि वृत्तपत्रादी माध्यमांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे. शासकीय मदतीवर चालणारी विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे यांच्याबरोबरच ‘गनेट सेंटर’ (न्यूयॉर्क) यांसारख्या खाजगी संस्था संशोधन, चर्चासत्रे, अभ्यासक्रमांचे आणि अध्यापनपद्धतींचे आधुनिकीकरण, ग्रंथनिर्मिती अशा विविध मार्गांनी पत्रकारितेच्या शिक्षणाचा कस वाढविण्यास साहाय्य करतात. पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी (उच्च माध्यमिक शिक्षणानंतर) चार वर्षे असतो. त्याला एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची जोड देऊन पदव्युत्तर पदवी घेता येते. एकूण अभ्यासक्रमाच्या २५% भाग प्रात्यक्षिके, कार्यानुभव, पत्रकारितेची तत्वे, इतिहास आणि संज्ञापनाचे सिद्धांत यांचा असतो. बाकी ७५% अभ्यासक्रमात भाषा, मानव्यविद्या व विज्ञाने यांनी व्यापलेला असतो

(कॅनडा : मार्शल मक्लूअन या इंग्लिशच्या प्राध्यापकाने माध्यमविषयक आपले क्रांतिकारक व द्रष्टे विचार टोराँटो विद्यापीठातील व्याख्यानात मांडले, त्यामुळे आता तेथे ‘मक्लूअन सेंटर फॉर कल्चर अँड टेक्नॉलॉजी’ची स्थापना करण्यात आली आहे.१९८० पर्यंत वृत्तपत्रविद्येचे शिक्षण देणार्या् कॅनडातील संस्थांची संख्या ७० (३० विद्यापीठे व ४० महाविद्यालये) झाली होती.


() इंग्लंड : लॉर्ड नॉर्थक्लिफ आणि इतर वृत्तपत्र-मालकांच्या आश्रयाने ‘लंडन स्कूल ऑफ जर्नॅलिझम’ ची स्थापना १९१९ मध्ये झाली. लंडन विद्यापीठाने १९१९ ते १९३९, अशी सु. २० वर्षे वृत्तपत्रविद्येचा पदविका अभ्यासक्रम चालविला होता. वृत्तपत्रांचे मालक, संपादक व पत्रकार यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन १९५२ मध्ये ‘नॅशनल काउंसिल फॉर द ट्रेनिंग ऑफ जर्नॅलिझम’ (एनसीटीजे) या संस्थेची स्थापना केली. इच्छुक उमेदवारांसाठी ‘एनसीटीजे’ ने () थेट प्रवेश व () प्रवेशपूर्व उमेदवारी अशा दोन पद्धती ठरविल्या आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये उमेदवार संपादकांकडे थेट अर्ज करुन वृत्तपत्रांत दाखल होतात. तेथे सहा महिने काम केल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना दोन-अडीच किंवा तीन वर्षांसाठी ‘शिकाऊ उमेदवार’ हा दर्जा दिला जातो. या काळात पदवीधर उमेदवार दहा आठवड्यांचा एक अभ्यासक्रम पूर्ण करतात. दुसर्याा पद्धतीतील उमेदवार प्रारंभीच्या सहा महिन्यांच्या सेवेनंतर एखाद्या महाविद्यालयात एक वर्ष पूर्णवेळ शिक्षण घेतात आणि त्यानंतर वृत्तपत्रातील प्रशिक्षण पूर्ण करतात. त्यानंतर त्यांना वृत्तपत्रांत तीन महिन्यांसाठी परिवीक्षा कालावर काम करावे लागते. परिवीक्षा कालावधीनंतर सव्वादोन वर्षे किंवा अधिक काळासाठी त्यांना शिकाऊ उमेदवार हा दर्जा मिळतो. ‘शिकाऊ उमेदवारां’च्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी ‘एनसीटीजे’ ने काही (सु. सात) महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. तेथे इंग्रजी भाषा, स्थानिक व राष्ट्रीय प्रशासन, वृत्तपत्रविषयक कायदे, लघुलेखन व टंकलेखन आणि वृत्तपत्रांची विविध अंगे ह्यांचे शिक्षण दिले जाते. शिकाऊ उमेदवारांच्या परिक्षेत, बातमीसाठी घ्यावयाची मुलाखत, प्रसिद्धीपत्रकावरुन सु. ३०० शब्दांची बातमी लिहिणे, लघुलेखन (मिनिटाला १०० शब्द), टंकलेखन, भाषणाच्या नोंदींच्या साहाय्याने ४०० ते ५०० शब्दांची बातमी लिहिणे इत्यादींचा समावेश असतो. ‘एनसीटीजे’ ने पदव्युत्तर एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कार्डिफच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ ला व लंडनच्या ‘सिटी युनिव्हर्सिटी’ ला मान्यता दिली आहे. राजकारण, अर्थकारण, संपादकीय लेखन इ. विशेष क्षेत्रांसाठी वृत्तपत्रे योग्य उमेदवारांची थेट भरतीही करतात. पण सर्वसाधारणपणे राष्ट्रीय वृत्तपत्रे प्रादेशिक वृत्तपत्रांतील पत्रकारांनाच आपल्या सेवेत घेतात.

() जर्मनी व फ्रान्स : पत्रकारितेच्या इतिहासासंबंधीची व्याख्याने जर्मनीतील विद्यापीठांमध्ये १६७२ मध्ये आयोजित केली जात. परंतु वृत्तपत्रविद्येच्या औपचारिक आणि सातत्यपूर्ण शिक्षणाचा प्रारंभ मात्र जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुमारास झाला. पत्रकारितेच्या कौशल्यांचे शिक्षण देणे हे आपल्या कक्षेत येत नाही, असे जर्मन विद्यापीठांचे मत होते, त्यामुळे इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, कायदा या विषयांवर जर्मन विद्यापीठातील पत्रकारिता विभाग भर देत. दुसर्याि महायुद्धानंतर जनमत व प्रचार यांना महत्त्व देण्यात येऊ लागले. दुसर्याा महायुद्धाच्या काळात बंद पडलेल्या वृत्तपत्रविद्या प्रबोधिनीचे पुनरुज्जीवन फ्रान्सने ‘फ्रेंच इन्स्टित्यूट ऑफ प्रेस’ या नावाने १९५१ मध्ये केले. १९५७ मध्ये ती सॉरबाँ विद्यापीठाला जोडण्यात आली आणि पदवी व पदविका देण्याचा अधिकार तिला १९६६ मध्ये मिळाला. १९७० च्या दशकापर्यंत युरोपमधील प्रत्येक देशात वृत्तपत्रविद्येचे सिद्धांत व कौशल्ये अशा दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्याच्या सोयी निर्माण झाल्या होत्या.

() रशिया : ऑक्टोबर क्रांतीनंतर (१९१७) लगेचच मॉस्को येथे ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ जर्नॅलिझम’ ची स्थापना झाली. दुसर्याश महायुद्धानंतर विद्यापीठीय केंद्रांनी तिची जागा घेतली. त्यातील पहिले केंद्र लेनिनग्राड विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात १९४६ मध्ये सुरु झाले. मॉस्को विद्यापीठातील केंद्र भाषाविज्ञान विभागात होते. रशियात वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाच्या तीन पद्धती आढळतात : () पाच वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम, () सहा वर्षांचा सायंकालीन अभ्यासक्रम, () टपालद्वारे शिक्षण. वृत्तपत्रे, नियतकालिके व वृत्तसंस्था यांमधील पत्रकारिता, ग्रंथप्रकाशन आणि नभोवाणी-दूरचित्रवाणी यांमधील पत्रकारिता यांतील एखाद्या विषयाचा विद्यापीठीय केंद्रात विशेष अभ्यास करता येतो. याशिवाय रशियन पत्रकारितेचा इतिहास, जनसंज्ञापनमाध्यमांचे समाजशास्त्र, रशियन भाषा व वाङ्‌मयीन समीक्षा या विषयांचा व दहा आठवड्यांच्या कार्यानुभवाचा वृत्तपत्रविद्येच्या अभ्यासक्रमांत समावेश असतो.

(७) आशिया खंड : वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापनविद्या यांचे औपचारिक शिक्षण देणार्याभ आशिया खंडातील संस्थांची संख्या १९३० च्या दशकात वीसपेक्षा कमी होती. १९७५ मध्ये ती संख्या २१० पर्यंत गेली. त्यांपैकी जवळजवळ निम्म्या संस्था अमेरिकी प्रणाली वापरतात. टोकिओच्या सोफाया विद्यापीठातील वृत्तपत्र विभाग १९३२ मध्ये सुरु झाला. तेथील अभ्यासक्रम चार वर्षांच्या अभ्यासक्रमात संशोधनावर भर दिला जातो. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात संशोधनावर भर असतो. मानिला (थायलंड) च्या ‘फारईस्टर्न’ ने १९३४ मध्ये आणि चीनमधील चेंगची विद्यापीठाने १९३५ मध्ये वृत्तपत्रविद्येचे अभ्यासक्रम सुरु केले. त्यानंतर इंडोनिशिया, कोरिया, सिंगापूर इ. देशात वृत्तपत्रविद्येचे अभ्यासक्रम सुरु झाले.

इंग्लंडच्या टॉमसन फौंडेशनने व आफ्रिका खंडातील वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणात मोलाची कामगिरी बजावली आहे. भारतातील ‘प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’, चीनची ‘झिनुआ’ ही वृत्तसंस्था, सिंगापूरमधील ‘अॅमिक’ (एशियन मास कम्युनिकेशन अँड रिसर्च सेंटर) इ. संस्थांच्या सहकार्याने टॉमसन फौंडेशन इंग्लंडमध्ये आणि त्या त्या देशांत अल्पमुदतीचे सेवांतर्गत अभ्यासवर्ग चालविते. जर्मनीची ‘फ्रीड्रिख एबर्ट फौंडेशन’ ही भारत, सिंगापूर येथील संस्थांच्या सहकार्याने संशोधन, चर्चासत्रे इ. कार्यक्रम राबविते.

() आफ्रिका खंड : संपूर्ण आफ्रिका खंडात स्वतंत्र देशांची संख्या १९५० मध्ये चार होती, ती १९७० मध्ये ३६ पर्यंत पोहोचली. नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी वृत्तपत्रविद्या वा जनसंज्ञापन-माध्यमांचे शिक्षण देणारी केंद्रे वेगाने सुरु केली. यांपैकी अनेक देशांत स्वतःच्या वृत्तसंस्थाही नव्हत्या; त्यामुळे पुस्तके, स्टुडिओ, साधने, अनुभवी शिक्षक यांचीही उणीव होती.

कैरोच्या अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम १९३७ मध्ये सुरु झाला. इस्राइलमध्ये जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठामध्ये संज्ञापन वृत्तपत्रविद्येसाठी स्वतंत्र संस्था सुरु करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील पॉचफ्स्ट्रूम विद्यापीठामध्ये माध्यम-व्यावसायिकांसाठीचा अभ्यासक्रम १९६० मध्ये सुरु झाला. उत्तर आफ्रिकेतील वृत्तपत्रविद्येची पहिली संस्था १९६४ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर अल्जीरिया, लिबिया, सीरिया इ. देशांमध्ये वृत्तपत्रविद्येशी संबंधीत असलेले अभ्यासक्रम व संस्था स्थापन झाल्या.

फ्रिकेच्या वासाहतिक इतिहासामुळे तेथे स्थानिक व प्रादेशिक भाषांपेक्षा इंग्रजी व फ्रेंच या भाषांचे राज्यकारभार, माध्यमे व शिक्षण या क्षेत्रांत वर्चस्व आहे. त्यामुळे वृत्तपत्रविद्येच्या संस्थांमध्ये वापरल्या जाणार्याइ पुस्तकांपैकी ६०% पुस्तके अमेरिकेतील व २०% पुस्तके इंग्लंडमधील आहेत, असे युनेस्को १९८७ मध्ये केलेल्या एका पाहणीत आढळले. काही ठिकाणी पुस्तकाची एकच प्रत, तीही शिक्षकाकडे, होती आणि विद्यार्थ्यांना त्याच्या छायाप्रती वापराव्या लागत.

() लॅटिन अमेरिका: तथाकथित ‘तिसऱ्या’ जगातील इतर देशांच्या तुलनेने दक्षिण व मध्य अमेरिकेतील देश पुष्कळच आधी स्वतंत्र झाले. शिवाय भौगोलिक व सांस्कृतिक सान्निध्यातील त्यांच्यापुढे उत्तर अमेरिकेतील शिक्षणाचा आदर्श होता. त्यामुळे वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाच्या बाबतीत आशिया व आफ्रिकेतील देशांपेक्षा लॅटिन अमेरिकेतील देशांनी आघाडी घेतली. ब्राझील व अर्जेंटिनामध्ये वृत्तपत्रविद्येचे शिक्षण देणार्या संस्था १९३० च्या दशकातच स्थापन झाल्या. त्यानंतरच्या दशकात एक्वादोर, मेक्सिको, पेरु आणि व्हेनेझुएला या देशांत अशा संस्था सुरु झाल्या. १९७० मध्ये या संस्थांची संख्या ८१ पर्यंत पोहोचली होती. मात्र यातील बहुतेक सर्व संस्थांना निधीचा व पात्र शिक्षकांचा तुटवडा जाणवतो. साधनेही तुटपुंजी व प्राथमिक स्वरुपाची आढळतात. बहुसंख्य अभ्यासक्रम अल्प मुदतीचे असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा समाधानकारक नसतो. या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून ब्राझीलने १९६९ मध्ये पत्रकारांना मात्यताप्राप्त संस्थेची पदवी मिळविणे बंधनकारक ठरविले. १९८० नंतरच्या दशकातील नव्या जागतिक माहिती व संज्ञापन-व्यवस्थेविषयीच्या आवेशपूर्ण चर्चेमुळे युनेस्कोने ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर अॅडव्हान्स स्टडिज इन जरनॅलिझम इन लॅटिन अमेरिका’ (सीआय्इएसपीएएल्) या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. शेतीविषयक संघटनांच्या मुळेही वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाला खूप साहाय्य झाले. शेतीतील आधुनिकतेचे तंत्र व संशोधन शेतकर्यांतपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांचा उपयोग अधिकाधिक प्रभावी पद्धतीने कसा करता येईल याचे संशोधन त्या संघटना करत असतात. वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी लॅटिन अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रे साहाय्य करतात.
                    
संदर्भ : 1. Astbury, A. K. Freelance Journalism, London, 1963.
            2. Careers Institute, Journalism as a Career, New Delhi, 1951.
            3. Dodge, John, Ed. The Practice of Journalism, London, 1963.
            4. Sengupta, B. Journalism as a Career, Culcutta, 1955.
            5. Williams, Francis, Journalism as a Career, London, 1962.
            ६. अकलूजकर, प्रसन्नकुमार, वृत्तपत्रविद्या, पुणे, २०००.
            ७. केळकर, न. चिं. संपा. केळकर, का.न. वृत्तपत्रमीमांसा, पुणे, १९६५.
                         
परांजपे, प्र. ना

Tuesday, 24 September 2013

वेब पत्रकारिता

माध्यम इंटरनेट
पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्काशी संबंधित चर्चा किंवा अभ्यासक्रम असला की त्याची सुरूवात हमखास उपलब्ध माध्यमांच्या प्रस्तावनेने होते. छापिल माध्यम अर्थात प्रेस वा प्रिंट मिडीया, मग रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन, आणि पुढे अगदी चित्रपटापर्यंतच्या विविध माध्यमांचा उल्लेख त्या प्रस्तावनेत अपरिहार्यपणे होतो. वृत्तपत्रांचा जनमानसावरील प्रभाव, दूरदर्शनच्या प्रभावातून उद्भवलेले परिणाम वगैरे विषय अगदी शाळकरी प्रश्नपत्रिकेत सुद्धा निबंध लिहीण्याचे विषय म्हणून डोकावताना दिसतात. बातम्यांची माध्यमं म्हणून वृत्तपत्रे आणि दूरदर्शन पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. ह्या व अशासारख्या चर्चेच्या ओघात 'मेरा नंबर कब आयेगा' म्हणत हमखास दरवाजाबाहेर ताटकळत असतं ते इंटरनेट.

इंटरनेट हे माध्यम?
खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी म्हणजे चॅनल काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचू शकत नाही. ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते. ह्याच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जर्सीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं. जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिक दृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.
जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.
३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्‍या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.

सुपर माध्यमाची बीजे
छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणार्‍या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्युज अॅट टेन म्हणून बरोबर दहा वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते. दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत. वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि तीन मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते.
इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

भाषेच्या मर्यादाही मागे पडत आहेत..
इंटरनेट म्हंटलं की इंग्रजी अपरिहार्य आहे, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील असं काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तामिळ, तेलुगू सारख्या भाषांचे युनिकोड फाँटस उपलब्ध झाल्याने आज अक्षरशः हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग्ज भारतीय भाषांतून सहजपणे तयार होताना दिसू लागले आहेत. मध्यंतरी जया बच्चन यांनी 'हम युपीवाले है, हम हिंदी में बोलेंगे' हे उदगार काढले आणि त्यावर गदारोळ उठला. ह्या प्रकरणात स्वतः अमिताभ बच्चनला काय म्हणायचय याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. अमिताभला जे म्हणायचे होते, ते अमिताभने भारताबाहेर असताना आपल्या ब्लॉगवर लिहीले. हा ब्लॉग अमिताभचा अधिकृत ब्लॉग असल्याने तो विश्वासार्ह होता. अमिताभ वृत्तपत्रांना वा वाहिन्यांना मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तरी ब्लॉगवरील त्याच्या स्वगतावरून सर्व वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी सविस्तर बातम्या दिल्या. जगभरात अक्षरशः लाखो लोकांनी तो ब्लॉग वाचला. आपल्या हजारो प्रतिक्रिया त्यावर नोंदवल्या. अमिताभचा हा ब्लॉग इंग्रजीत होता. मात्र ज्यांना चांगले इंग्रजी येत नाही, असे महत्वाचे पुढारी वा तत्सम महत्वाच्या व्यक्तींना आज हिंदी, मराठी वा तत्सम भाषेत आपला ब्लॉग तयार करणे आज शक्य आहे. इंटरनेटने इंग्रजी भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरीच क्रांतीकारक आहे.
इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.

सर्वसामान्यांची पत्रकारिता
वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा नेहमीच एक महत्वाचा भाग मानला जातो. कित्येकदा जेथे बातमीदार पोहोचत नाही अशा एखाद्या मुद्यापर्यंत एखादा वाचक पोहोचलेला असतो. तो पत्र लिहून ती बाब वृत्तपत्राला कळवतो तेव्हा आश्चर्याचे धक्के बसतात, आणि चक्रे वेगाने फिरतात. अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आता ह्या वाचकांच्या पत्राच्या पुढे नेणारी सर्वसामान्यांची पत्रकारिता किंवा सिटीझन्स जर्नालिझम जगभरात बहरताना दिसतो आहे. माध्यमांच्या दृष्टीने म्हंटले तर एकीकडे हे आव्हान आहे, तर दुसरीकडे ते एक वरदानही आहे. ज्या वृत्तपत्राकडे सिटीझन जर्नालिझमची जास्तीत जास्त शक्ती असेल, वा ज्या वाहिनीकडे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून प्रत्यक्ष घेतलेल्या व्हिडिओ क्लीप्स येत असतील अशा वाहिनींची ताकद इतरांपेक्षा अधिक असणार आहे. प्रगत होत चाललेले तंत्रज्ञान एकीकडे सोपे आणि दुसरीकडे किंमतीला अतिशय स्वस्त व परवडण्याजोगे असल्यानेच सिटीझन जर्नालिझमचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागणार आहे. शे दोनशेला मिळणारा डिजिटल कॅमेरा शेकडो छायाचित्रे घेऊ शकेल व त्यातली अनेक छायाचित्रे इंटरनेटवरून अपलोड होऊन क्षणार्धात वृत्तपत्रे व वाहिन्यांकडे पोहोचू शकतील. हाच प्रकार काही फरकाने व्हिडिओ कॅमेर्‍यांच्या बाबतीतही होणार आहे.

खर्‍या अर्थाने मल्टीमिडिया
सर्वसामान्यांची पत्रकारिता हे खरं तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. आजचे ब्लॉग्ज हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वृत्तपत्रे व वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकूर, चित्रे, छायाचित्रे, विचार असा समृद्ध ज्ञानखजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे. इंटरनेटच्या पोटात अशा प्रकारची छोटी मोठी माध्यमं नांदत राहणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आज ज्यांना आपण माध्यमं म्हणतो त्यावर होत जाणार आहे. प्रगत राष्ट्रांतील कित्येक दैनिक वृत्तपत्रांमध्ये आज दररोज वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईटस व ब्लॉग्जची माहिती वाचकांना दिली जात असते. भाषिक वृत्तपत्रे त्या दृष्टीने आज मागे दिसतात. पण उद्या त्यांना हा भाग ठळकपणे द्यावाच लागणार आहे.

इंटरनेटच्या मर्यादा आणि उद्या
इंटरनेटचं ताकदवान माध्यम कोणत्याही मर्यादांविना उभं आहे असं चित्र मला इथे रंगवायचं नाही. हे मुद्दे निघाले की हमखास समोरून प्रश्न येतो, की आम्ही बसमध्ये वा रेल्वेगाडीत बसून वृत्तपत्र वाचत जातो. इंटरनेटचं तसं कुठे करता येतं? आरामखुर्चीत बसून इंटरनेटवरचा पेपर कुठे वाचता येतो? किंवा प्रकाशमान संगणकी स्क्रीनवरचं एक पान वाचलं की डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ह्या इंटरनेटच्या आजच्या काही मर्यादा जरूर आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट दिसतं, ते कुठेही पहाता येतं असं मी म्हणणार नाही. कारण त्यात तर प्रचंड मर्यादा आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की गरज ही शोधाची जननी असते. शास्त्रज्ञांचे आजचे प्रयत्न ई इंक आणि ई पेपर च्या दिशेने चालले आहेत. झेरॉक्स, मोटोरोला सारख्या कंपन्या गेली काही वर्षे अब्जावधी रूपये खर्च करून संशोधन करीत आहेत. ई पेपर २०१५ च्या आसपास प्रत्यक्षात येईल अशी चर्चा तज्ज्ञ आणि माहीतगार मंडळी करीत आहेत. ई पेपर असेल आपल्या रोजच्या पेपर सारखाच. संपूर्ण आकाराचा. उदबत्तीचा गोल आकाराचा सुरनळीसारखा बॉक्स असेल तशी सुरनळी ह्या पेपरची होईल. ती तुम्ही जवळ ठेवायची. दर पाच दहा मिनिटांनी त्यातला मजकूर व छायाचित्रे बदलत असतील. तुम्हाला वेळ मिळाला की पेपरची ती सुरनळी सरळ करायची. आलेली ताजी बातमी पहायची. सुरनळी परत ठेवून द्यायची. जे दैनिक हवे त्याची वर्गणी भरलेली असली की त्यावर त्या बातम्या आपोआप उमटत राहणार. ई इंक चे अतिसुक्ष्म कण त्या ई पेपरवर आपोआप इकडे तिकडे होऊन नवनवी अक्षरे, मथळे, छायाचित्रे रिमोट पद्धतीने त्यावर उमटणार. बातमीदार तसच काम करत असणार. अग्रलेख तसेच येत राहतील. लेख तसेच असतील. फक्त पेपर आणि इंक बदलेल.
आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.
एक मात्र नक्की, की माध्यमांचे दृश्य बदलले तरी त्याचा आत्मा बदलणं विज्ञानाच्या ताकदीबाहेरचं आहे. माणसाची चाल पायावरच राहणार आहे. आजचा कागदी पेपर असो की उद्याचा ई पेपर माणसाची चाल पायांनी आणि विचार डोक्यातूनच येत राहणार आहे. ई पेपर आल्याने माध्यमांच्या भूमिकेत मोठा बदल संभवतो अशी चर्चा मात्र जगभर कुठेही चाललेली दिसत नाही.

माधव शिरवळकर

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...