Sunday, 22 September 2013

नागरिक पत्रकार

नागरिक पत्रकार - विश्वासार्हतेची एक नवी वाट

“We are at the beginning of a Golden Age of journalism — but it is not journalism as we have known it. Media futurists have predicted that by 2021, citizens will produce 50 per cent of the news peer-to-peer. However, mainstream news media have yet to meaningfully adopt or experiment with these new forms.”
न्यू मिडीया या एका महत्त्वाच्या संकेतस्थळावर ठळकपणे लिहिलेले हे वाक्य एका नव्या पत्रकारितेच्या आश्वासक प्रवासाची नांदीच स्पष्ट करत आहे. नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन जर्नालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्‍यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे. 2003 मधे इराक युद्धात अहमद या नागरिकाने युद्धभूमीवरून थेट धाडलेल्या बातम्या जागतिक स्तरावर गाजल्या होत्या. दोन देशांमधे जेंव्हा युद्ध होते तेंव्हा तेंव्हा दोन्ही देशाच्या प्रसारमाध्यमातून येणार्‍या बातम्या या बर्‍याच वेळा एका बाजूला झुकलेल्या आणि त्यामुळे वस्तुस्थितीपासून दूर जाणार्‍या असतात असा आपला आजवरचा अनुभव आहे. या अहमदने मात्र जे घडते आहे तेच सांगितले, जे पाहिले ते कथन केले त्यामुळे जागतिक पातळीवर सुद्धा या युद्धाची सत्यस्थती समजली आणि त्यावरून जागतिक संबंधांचा अभ्यास करता आला. 1988 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीत ही नागरिक पत्रकारितेची चुणूक पहायला मिळाली. निवडणूकामधे काय होणार, कोण निवडून येणार, जनतेला काय हवे आहे. याविषयी प्रस्थापित पत्रकारांच्या अंदाजाबद्दल जनमानसात एक अविश्वासाची भावना निर्माण झाली होती. आणि या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातले वास्तव या नव्या पत्रकारितेमधून पुढे आले.
१९०४ मधे रादरगेट या नावाने प्रसिद्ध असलेली ब्लॉगर्सच्या यशस्वी पत्रकारितेची गाजलेली घटना इथे सांगावीशी वाटते. डॅन रादर हा सीबीएस या प्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन चॅनलचा नावाजलेला पत्रकार आपल्या सिक्स्टी मिनिट या कार्यक्रमात तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या राष्टीय संरक्षण सेवेसंबंधी काही कागदपत्रे त्यांनी वाहिनीवर दाखविली. ती विश्वासार्ह नाहीत असा दावा काही ब्लॉगर्स नागरिकांनी पुराव्यासहित केला. अर्थातच वाहिनीला माफी मागावी लागली आणि डॅन रादर यांनी आपली सेवा निवृत्ती त्याचा विहित कालावधी संपण्याच्या एक वर्ष आधीच 2005 मधे जाहिर केली. एका नावाजलेल्या पत्रकाराची माहिती खोटी ठरवणे आणि पुराव्यानिशी ती सिद्ध करणे हा नागरिक पत्रकारितेचा सर्वोत्तम नमुना मानायला हवा. गेल्या 10-12 वर्षात ही पत्रकारिता इंटरनेटच्या प्रसारामुळे सर्वसमावेशक आणि सुनियंत्रित स्वरूपात पुढे येऊ लागली आहे. वेब2.0 या नावाने प्रसिद्ध असलेली संगणक प्रणाली 2004 मधे विकसित झाली. माहितीचे आदानप्रदान त्यामुळे सुकर झाले. लोकांचा सहभाग मोठया प्रमाणात होऊ लागला. ब्लॉग,चर्चास्थळं, ब्रॉडकास्टींग यांच्या माध्यमातून घटना सर्वदूरपर्यंत पोहोचवता येऊ लागल्या. यातून या पत्रकारितेची कक्षा विस्तारली.
आपल्याला असा प्रश्न पडेल की सर्वसाधारण नागरिक म्हणून या पत्रकारितेचे नेमके महत्त्व काय आहे? यांनी खरंच समाजामधे येणारी माहिती अधिक प्रगल्भ, नि:पक्षपातीपणे येत आहे का? एकूणच बातम्यांचा स्तर सुधारला आहे का? तर याचे उत्तर बऱ्याच अंशी होकारार्थी येईल. सिटिझन पत्रकारिता हा जनतेच्या सहभागातून पुढे आलेला प्रवाह असल्यामुळे त्याला एक अंगभूतच विश्वासार्हता प्राप्त झालेली आपल्याला दिसेल.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांची हत्त्या चित्रित करणारा एक सर्वसाधारण नागरिक हा आद्य नागरिक पत्रकार मानला जातो.
दिल्ली मधे नुकत्याच झालेल्या जंतरमंतर इथल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे ते एका रात्रीत देशाचे महानायक बनले. यामधे राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांचा वाटा मोठा आहेच पण इंटरनेट माध्यमातून भारतभर तरूणाईमधे यामुळे निर्माण झालेली चैतन्यमय सळसळ यांनी या चळवळीला फार मोठी ताकद दिली. एक जनाधार दिला. फेसबूक आणि ट्विटर या माध्यमातून लाखो लोकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. माहितीची देवाणघेवाण करणं आणि त्यावरून मतं बनवणं हे पारंपरिक पत्रकारितेचे काम आता हा सिटीझन जर्नालिस्ट प्रभावीपणे करू लागला आहे. भल्याभल्या राजकीय नेत्यांना जे जमले नाही ते या नगर जिल्ह्यातल्या सामान्य निवृत्त लष्करी सैनिकाने ८ दिवसात करून दाखवले. अण्णा हजारे हा न्याय आणि भ्रष्टाचार विरोधात लढणारा एक ब्रँड झाला याचे श्रेय नि:संशयपणे त्यांच्या चारित्र्यसंपन्न इतिहासाला आहेच तसेच ते त्यांच्याबाबत जनमानसात निर्माण होणार्‍या वाढत्या प्रतिसादालाही आहे.
सिटीझन जर्नालिस्ट हा नि:संशयपणे समाजातील सक्रिय लोकांमुळे पुढे आलेला एक प्रागतिक विचार आहे. समाजाच्या विकासाचा जास्तीतजास्त चांगला विचार समाजच करु शकतो. गेल्या १० वर्षांत २४ तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिनींच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे बातम्या आणणार्‍या बातमीदारांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष गरज यामधे मोठी तफावत पडू लागली. यातूनच बातम्या संकलनामधे समाजाच्या थेट सहभागाची संकल्पना आकार घेऊ लागली. सर्वच महत्त्वाच्या वृत्तवाहिन्यांकडे अशा निवडक पत्रकारांची आता फौज निर्माण झाली आहे.
बातमी म्हटलं की राजकीय,सामाजिक, क्रीडा विषयक, अर्थकारण, वैद्यकीय या परिक्षेत्राचा विचार प्राधान्यानं होत असे पण आता बातमी ही अत्यंत बहुआयामी, समाजातील सर्व स्तरांचा विचार करणारी आणि मुख्यत्वे लोकांच्या भावविश्वाशी अधिक तादात्म्य पावणारी या स्वरूपात पुढे येताना दिसते. खऱ्या अर्थानं आता बातमीचे वस्तूकरण झाल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.
अर्थात त्यामुळे ही आपली बातमी नावाची वस्तू आकर्षक, विश्वसनीय आणि इतरांपेक्षा हटके असावी असे सर्वच प्रसारमाध्यमांना वाटू लागले. यातून समाजाच्या सर्वांगापर्यत जाण्याची या वृत्तसंकलन करणार्‍या संस्थांना निकड भासू लागली आणि यातूनच ही पत्रकारिता सर्वमान्य होऊ लागली. अर्थात या पत्रकारितेबद्दल काही आक्षेपही आहेत. ज्यांना पत्रकारितेचं प्राथमिक शिक्षण नाही त्यांनी या क्षेत्रात अशा प्रकारे काम करणे हे काहींना मान्य नाही. पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यामुळेच एरवी माध्यमांना कळणारही नाहीत अशा घटना बातम्या होऊन पुढे येऊ लागल्या आहेत. अमेरिकच्या ट्विन टॉवरवर झालेला दहशतवादी हल्ला, २६.११ ला मुंबईवर अतिरेक्यांनी घातलेली झडप या सारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटनेत सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या ब्लॉग्ज वरून प्रसारित केलेली माहिती तपासकार्यामधे उपयोगी पडल्याचे सिद्ध झाले आहे.
आपण एक लक्षात घेतले पाहिजे की जेंव्हा कोणतीही घटना घडते तेंव्हा तिथे पत्रकार उपस्थित असेलच असे नाही. किंबहुना बऱ्याच प्रसंगी तो नसतोच. या घटनेला साक्षीदार असतो तिथे त्यावेळी हजर असलेला सर्वसाधारण माणूस, नागरिक. त्यात कोणी विद्यार्थी असतो, चाकरमानी असतो, फेरीवाला असतो कुणी गृहिणी असते तर कुणी व्यापारी. यातूनच पुढे येतो नागरिक पत्रकार ज्यांच्याकडे असते घटनेची इत्यंभूत माहिती, त्याला हे पत्रकारितेच्या शास्त्रानुसार कसे सांगायचे हे माहिती नसते हे मान्य करूनही सत्यता हा बातमीचा महत्त्वाचा निकष मानला तर माध्यमांतून आँखो देखा बातमी मिळते हे निश्चित.
त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ओसामा बिन लादेन याला मारण्यासाठी अमेरिकन हेलिकॉप्टर्स जेंव्हा घिरटया घालत होती ती बातमी. एका संगणक अभियंत्याने ती घरघर ऐकली आणि ती माहिती ट्विटर वर टाकली. त्यावेळी त्याच्या संपर्कात केवळ ७५० व्यक्ती होत्या पण या बातमीने त्याच्या संकेत स्थळावर झुंबड उडाली. त्याची संख्या झाली ८६ हजार. आंतरराष्ट्रीय महत्त्वाची बातमी सर्वप्रथम जाहिर करण्याचे ६श्रेय अशाप्रकारे एका नागरिक पत्रकाराला मिळाले. इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांना राजीनामा देण्यास भाग पाडून पदच्यूत करण्यात नागरिक पत्रकारानी केलेल्या चळवळीचा वाटा मोठा आहे.
एक जागतिक चळवळ म्हणून याकडे आता पाहिले जात आहे त्याचा आवाकाही आता मोठा होत आहे. ऑल व्हॉइसेस सारख्या संस्थेकडे आज जगभरातून 5 लाख नागरिक पत्रकार आपल्या भागातल्या घटना नियमितपणे या संकेतस्थळावर नोंदवत आहेत.
नागरिक पत्रकारितेची काय वैशिष्टये आहेत याचा नीट विचार केला तर या सगळया सोपस्कारातून आपल्याला अनेक भौत्रिक गोष्टींची माहिती मिळते, नव्या संकल्पना पुढे येतात. वेगवेगळी माणसं समजतात, अनेक प्रकल्प साकार होतात. आपल्याला रूची असणाऱ्या मानवी व्यवहारातील काही अद्भूत, कधी मनाला चटका लावणार्‍या तर कधी स्फूर्ती देणाऱ्या सत्य घटना आपल्या पर्यावरणाचा भाग बनतात. आणि हे सगळं होण्याचं कारण म्हणजे ही माहिती देणारा कुणी पगारी पत्रकार नसतो, केवळ कर्तव्यबुद्धी आणि व्यवसायाचा भाग यात नसतो. असते एक सूप्त इच्छा सांगण्याची व्यक्त होण्याची. इंटरनेटच्या मायाजालात अनेक ब्लॉग्ज आणि सार्वजनिक संकेतस्थळं ही माणसाच्या याच व्यक्त होण्याच्या अतिव इच्छेतून जन्माला आलेली आहेत. फेसबूक हे संकेतस्थळ तर जगातल्या माणूस नावाच्या समस्त समाजाचं व्यक्त होण्याच्या आणि नातेसंबंध फुलवण्याच्या उर्मीचं आणि ऊर्जेचं एक प्रतीक बनून राहिले आहे. माध्यमजगात होणार्‍या वेगवान बदलाचा हा पत्रकारितेचा नवा फंडा हा एक सकारात्मक अविष्कार आहे.
अर्थात ही पत्रकारिता सोपी नाही, जाताजाता करण्यासारखी गोष्ट नाही याचं भान आपण ठेवायला हवं. त्यासाठी बातमी कशाला म्हणायची याची प्राथमिक जाण आपल्याला हवी. कारण आपण पाठवत असलेल्या घटनेचा तपशील हा सर्वसाधारण वाचकांना, श्रोत्यांना, प्रेक्षकांना भावणारा हवा. तुमचे वैयक्तिक अनुभव सार्वत्रिकतेची डूब घेऊन पुढे यायला हवेत. सार्वजनिक जीवनात वावरताना तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, सरकार, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून तुम्हाला येणारे अनुभव प्रभावीपणे आणि थोडक्यात मांडण्याची हातोटी तुमच्याकडे हवी. आपल्या आजूबाजूला डोळसपणे पाहाण्याची आणि संवेदनशील मनाने या घटना टिपण्याची एक नजर तुमच्यात विकसित झाली तर तुम्ही एक आदर्श नागरिक पत्रकार होऊ शकता.

दोन महिन्यांपूर्वी पावसाळ्यात इंदोर जवळील व एका पर्यटनस्थळी वाहुन गेलेल्या माणसांची दृश्ये ही अन्य एका पर्यटकानं मोबाईलमध्ये चित्रित करून चॅनलला दिली अन् सर्वांना पहाता आली. असंख्य अपघातांची तिथे हजर असलेल्या सामान्य नागरिकांनी चित्रित केलेली दृश्ये चॅनलला खूप उपयुक्त ठरतात.
२००५ मधे आपल्या देशात माहितीचा अधिकार हा हक्क सर्वसामान्य नागरिकांना प्रदान करण्यात आला. त्यामुळे सजग नागरी मंच, सिव्हिल सोसायटी या संकल्पना मूळ धरू लागल्या. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने गोपनीय अशी माहिती सोडून बाकीची सर्व माहिती मागणी केल्यास नागरिकांना उपलब्ध करून देणे कायद्याने अनिवार्य झाले. संपूर्ण राज्यकारभारात, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात एक पारदर्शकता निर्माण झाली. या साऱ्या घडामोडींमुळे नागरी पत्रकारितेच्या विकासाला चांगला हातभार लागला.
आपल्या देशात या वर्षाच्या सुरवातीला गाजलेला कॉमनवेल्थ खेळातील भ्रष्टाचार आणि मुंबईच्या आदर्श सोसायटीतील अनियमितता ही वृत्तवाहिन्यांनी चव्हाटयावर आणली त्यात त्यांच्या शोधपत्रकारितेचा मोठा वाटा आहेच पण सर्वसामान्य नागरिकांकडूनही त्यांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. सजग नागरिक हा एक चांगला पत्रकार होऊ शकतो हेच या प्रसंगाने सिद्ध झाले.

सिटीझन जर्नालिस्ट ही आता मान्यताप्राप्त संकल्पना झाली आहे. अमेरिकेतील महत्त्वाच्या राजकीय परिषदांना आता या मंडळीना अधिकृत निमंत्रणे येऊ लागली आहेत. ऑलिंपिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमंत्रणांमधे सिटीझन जर्नालिस्ट यांचा होणारा समावेश हे याला मिळत असलेल्या लोकमान्यतेचे उदाहरण म्हणता येईल. अमेरिके सारख्या संपन्न देशात आज नागरिकांच्या बातमी मिळण्याच्या स्त्रोतात बदल झाल्याचे दिसतात. आता वेबसाईट्स वरून, ट्विीटर वरून येणाऱ्या बातम्या जास्त वाचल्या जातात. यात मिळणार्‍या बातम्या या नागरिकांनी परस्परात वितरित केलेल्या अशा स्वरूपाच्या असतात. साहजिकच त्यामुळे नागरीक पत्रकारितेला मिळणारा प्रतिसाद हा वाढत आहे.
विकीपिडीया हे या वाचकांच्या सहभागातून त्यांनी तयार केलेल्या मजकूराच्या, माहितीच्या महाजालामुळे केवढया प्रमाणात विस्तारित झाले आहे ते आपण पहातो आहोतच. विकीन्युज हे त्यांचे संकेतस्थळ हे नागरिक पत्रकारितेलाच वाहिलेले आहे. गुगल हे असंच एक शोध संकेतस्थळ यावर कोणतीही माहिती एका क्लिकसरशी आपल्या पुढयात येते यावरचा बराच मजकूर हा सर्वसामान्य नागरिकांच्या माहिती स्त्रोतातून उपलब्ध झालेला असतो.
अर्थात सोशल साईट्सवर टाकला जाणारा प्रत्येक मजकूर म्हणजे नागरिक पत्रकारिता नव्हे याचे भान ही बाळगणे आवश्यक आहे. म्हणूनच या पत्रकारितेवर काही जण प्रतिकूल अभिप्रायही व्यक्त करताना दिसतात. यातला मुख्य म्हणजे ही पत्रकारिता नाही, एखाद्या ठिकाणी हजर असलात आणि तुमच्याकडे कॅमेरा असला म्हणजे तुम्ही पत्रकार होत नाही. पत्रकारितेचे रितसर शिक्षण न घेता पत्रकार म्हणून मिरवणे याला काही जणांचा विरोध आहे. शिवाय बातमी कशाला म्हणायचं याचं ज्ञान अनेक जणांना नसतं त्यामुळे बऱ्याच वेळा निरर्थक मजकूर, आणि अनावश्यक माहिती पुढे येते. शिवाय ती कशी मांडायची याचे एक शास्त्र आहे. नागरिक पत्रकारांनी ते समजावून घेतल्यास अनेक प्रसार माध्यमं ते प्रसिद्ध करण्यास तयार होतात असा अनुभव आहे. स्थानिक घडामोडी आपल्या विभागातल्या नागरिकांपर्यंत पाहोचवणे आणि सामाईक प्रश्नांवर, समस्यांवर परस्पर विचारविनिमयामधून मार्ग शोधणे यासाठी सिटीझन जर्नालिस्ट हे अत्यंत उपयुक्त असे व्यासपीठ आहे. तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या संपर्क सुविधांमुळे एरवी आत्म केंदि्रत झालेला समाज आता हळूहळू बोलायला लागला आहे. अर्थात जगाच्या बातम्या समजून घेताना आपल्या शेजारच्या सदनिकेत रहाणाऱ्या मुलाचे नाव काय? तो कितवीत आहे हे माहित नसणार्‍यांची संख्याही शहरी भागात लक्षणीय आहे. आपण फक्त माहितीचे भुकेले आहोत. एवढे असून चालणार नाही. आपली संवेदनशीलता, आत्मियता ही जाणीवपूर्वक वाढवायला हवी. कारण आपण शेजाऱ्याचा विचार केला तरच समाजाचा, देशाचा विचार करू शकू. आपण ग्लोबल बनताना आपला लोकल चेहरा पुसला जाणार नाही याची काळजी आता आपल्याला घ्यायला हवी. यातच खऱ्या नागरिक पत्रकाराची मूल्यं दडलेली आहेत. नागरिक पत्रकाराची भूमिका ही 'जागल्याची' असली पाहिजे. आप ्याला मिळालेली माहिती जर जनहितविरोधी असेल अथवा कल्याणकारी असेल तर ती त्यानं चॅनल अथवा वृत्तपत्रांना त्वरित कळवायला हवी. त्या बातमीची सत्यासत्यता, महत्व आणि गांभीर्य ठरविण्याचं काम माध्यमं करतील. त्यासाठी सामान्य नागरिक पत्रकाराने कायदा हातात घेवू नये अथवा त्याचा गैरवापर करू नये ही त्याच्यावरची मोठीच जबाबदारी आहे.

डॉ. केशव साठये
9,सावरी सोसायटी, हॅपी कॉलनी, कोथरूड,
पुणे 411029 मो: 98221 08314

माध्यम इंटरनेट

पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्काशी संबंधित चर्चा किंवा अभ्यासक्रम असला की त्याची सुरूवात हमखास उपलब्ध माध्यमांच्या प्रस्तावनेने होते. छापिल माध्यम अर्थात प्रेस वा प्रिंट मिडीया, मग रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन, आणि पुढे अगदी चित्रपटापर्यंतच्या विविध माध्यमांचा उल्लेख त्या प्रस्तावनेत अपरिहार्यपणे होतो. वृत्तपत्रांचा जनमानसावरील प्रभाव, दूरदर्शनच्या प्रभावातून उद्भवलेले परिणाम वगैरे विषय अगदी शाळकरी प्रश्नपत्रिकेत सुद्धा निबंध लिहीण्याचे विषय म्हणून डोकावताना दिसतात. बातम्यांची माध्यमं म्हणून वृत्तपत्रे आणि दूरदर्शन पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. 

खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. याच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जर्सीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं. जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिक दृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.

जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.

३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्‍या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.

छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणार्‍या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्युज अॅट टेन म्हणून बरोबर दहा वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते. दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत. वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि तीन मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते.

इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

भाषेच्या मर्यादाही मागे पडत आहेत.. 

इंटरनेट म्हंटलं की इंग्रजी अपरिहार्य आहे, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील असं काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तामिळ, तेलुगू सारख्या भाषांचे युनिकोड फाँटस उपलब्ध झाल्याने आज अक्षरशः हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग्ज भारतीय भाषांतून सहजपणे तयार होताना दिसू लागले आहेत. मध्यंतरी जया बच्चन यांनी 'हम युपीवाले है, हम हिंदी में बोलेंगे' हे उदगार काढले आणि त्यावर गदारोळ उठला. ह्या प्रकरणात स्वतः अमिताभ बच्चनला काय म्हणायचय याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. अमिताभला जे म्हणायचे होते, ते अमिताभने भारताबाहेर असताना आपल्या ब्लॉगवर लिहीले. हा ब्लॉग अमिताभचा अधिकृत ब्लॉग असल्याने तो विश्वासार्ह होता. अमिताभ वृत्तपत्रांना वा वाहिन्यांना मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तरी ब्लॉगवरील त्याच्या स्वगतावरून सर्व वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी सविस्तर बातम्या दिल्या. जगभरात अक्षरशः लाखो लोकांनी तो ब्लॉग वाचला. आपल्या हजारो प्रतिक्रिया त्यावर नोंदवल्या. अमिताभचा हा ब्लॉग इंग्रजीत होता. मात्र ज्यांना चांगले इंग्रजी येत नाही, असे महत्वाचे पुढारी वा तत्सम महत्वाच्या व्यक्तींना आज हिंदी, मराठी वा तत्सम भाषेत आपला ब्लॉग तयार करणे आज शक्य आहे. इंटरनेटने इंग्रजी भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरीच क्रांतीकारक आहे.

इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.

सर्वसामान्यांची पत्रकारिता 

वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा नेहमीच एक महत्वाचा भाग मानला जातो. कित्येकदा जेथे बातमीदार पोहोचत नाही अशा एखाद्या मुद्यापर्यंत एखादा वाचक पोहोचलेला असतो. तो पत्र लिहून ती बाब वृत्तपत्राला कळवतो तेव्हा आश्चर्याचे धक्के बसतात, आणि चक्रे वेगाने फिरतात. अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आता ह्या वाचकांच्या पत्राच्या पुढे नेणारी सर्वसामान्यांची पत्रकारिता किंवा सिटीझन्स जर्नालिझम जगभरात बहरताना दिसतो आहे. माध्यमांच्या दृष्टीने म्हंटले तर एकीकडे हे आव्हान आहे, तर दुसरीकडे ते एक वरदानही आहे. ज्या वृत्तपत्राकडे सिटीझन जर्नालिझमची जास्तीत जास्त शक्ती असेल, वा ज्या वाहिनीकडे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून प्रत्यक्ष घेतलेल्या व्हिडिओ क्लीप्स येत असतील अशा वाहिनींची ताकद इतरांपेक्षा अधिक असणार आहे. प्रगत होत चाललेले तंत्रज्ञान एकीकडे सोपे आणि दुसरीकडे किंमतीला अतिशय स्वस्त व परवडण्याजोगे असल्यानेच सिटीझन जर्नालिझमचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागणार आहे. शे दोनशेला मिळणारा डिजिटल कॅमेरा शेकडो छायाचित्रे घेऊ शकेल व त्यातली अनेक छायाचित्रे इंटरनेटवरून अपलोड होऊन क्षणार्धात वृत्तपत्रे व वाहिन्यांकडे पोहोचू शकतील. हाच प्रकार काही फरकाने व्हिडिओ कॅमेर्‍यांच्या बाबतीतही होणार आहे.

खर्‍या अर्थाने मल्टीमिडिया 

सर्वसामान्यांची पत्रकारिता हे खरं तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. आजचे ब्लॉग्ज हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वृत्तपत्रे व वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकूर, चित्रे, छायाचित्रे, विचार असा समृद्ध ज्ञानखजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे. इंटरनेटच्या पोटात अशा प्रकारची छोटी मोठी माध्यमं नांदत राहणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आज ज्यांना आपण माध्यमं म्हणतो त्यावर होत जाणार आहे. प्रगत राष्ट्रांतील कित्येक दैनिक वृत्तपत्रांमध्ये आज दररोज वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईटस व ब्लॉग्जची माहिती वाचकांना दिली जात असते. भाषिक वृत्तपत्रे त्या दृष्टीने आज मागे दिसतात. पण उद्या त्यांना हा भाग ठळकपणे द्यावाच लागणार आहे.

इंटरनेटच्या मर्यादा आणि उद्या 

इंटरनेटचं ताकदवान माध्यम कोणत्याही मर्यादांविना उभं आहे असं चित्र मला इथे रंगवायचं नाही. हे मुद्दे निघाले की हमखास समोरून प्रश्न येतो, की आम्ही बसमध्ये वा रेल्वेगाडीत बसून वृत्तपत्र वाचत जातो. इंटरनेटचं तसं कुठे करता येतं? आरामखुर्चीत बसून इंटरनेटवरचा पेपर कुठे वाचता येतो? किंवा प्रकाशमान संगणकी स्क्रीनवरचं एक पान वाचलं की डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ह्या इंटरनेटच्या आजच्या काही मर्यादा जरूर आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट दिसतं, ते कुठेही पहाता येतं असं मी म्हणणार नाही. कारण त्यात तर प्रचंड मर्यादा आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की गरज ही शोधाची जननी असते. शास्त्रज्ञांचे आजचे प्रयत्न ई इंक आणि ई पेपर च्या दिशेने चालले आहेत. झेरॉक्स, मोटोरोला सारख्या कंपन्या गेली काही वर्षे अब्जावधी रूपये खर्च करून संशोधन करीत आहेत. ई पेपर २०१५ च्या आसपास प्रत्यक्षात येईल अशी चर्चा तज्ज्ञ आणि माहीतगार मंडळी करीत आहेत. ई पेपर असेल आपल्या रोजच्या पेपर सारखाच. संपूर्ण आकाराचा. उदबत्तीचा गोल आकाराचा सुरनळीसारखा बॉक्स असेल तशी सुरनळी ह्या पेपरची होईल. ती तुम्ही जवळ ठेवायची. दर पाच दहा मिनिटांनी त्यातला मजकूर व छायाचित्रे बदलत असतील. तुम्हाला वेळ मिळाला की पेपरची ती सुरनळी सरळ करायची. आलेली ताजी बातमी पहायची. सुरनळी परत ठेवून द्यायची. जे दैनिक हवे त्याची वर्गणी भरलेली असली की त्यावर त्या बातम्या आपोआप उमटत राहणार. ई इंक चे अतिसुक्ष्म कण त्या ई पेपरवर आपोआप इकडे तिकडे होऊन नवनवी अक्षरे, मथळे, छायाचित्रे रिमोट पद्धतीने त्यावर उमटणार. बातमीदार तसच काम करत असणार. अग्रलेख तसेच येत राहतील. लेख तसेच असतील. फक्त पेपर आणि इंक बदलेल.

आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.


Sunday, 8 September 2013

वृत्तसंस्था


              


            



















प्रादेशिक
राष्ट्रीय
आतंरराष्ट्रीय

वर्तमानपत्र लेखन

नियतकालिकांच्या आर्थिक व्यवस्था

नियतकालिकांच्या आर्थिक व्यवस्थेत जमेची फक्त तीन अंग आहेत : वर्गणीदारांकडून येणारे उत्पन्न, किरकोळ अंकांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम आणि जाहिरातदारांकडून येणारे उत्पन्न; परंतु यापेक्षा खर्चाचे तपशील अधिक आहेत. उदा., कागद आणि छपाईचा खर्च, अंकबांधणीचा खर्च, टपालखर्च, लेखकांचा मोबदला, संपादकीय व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन इत्यादी. जमेच्या बाजूला किरकोळ अंकविक्रीपासून मिळणारी रक्कम ही तुलनेने सर्वात गौण आवक आहे. वर्गणी व जाहिराती यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच नियतकालिकांना खर्चाशी तोंडमिळवणी करावी लागते. जाहिरातींचे उत्पन्न हा या एकूण उत्पन्नाचा फार मोठा घटक आहे; तथापि वर्गणीचे उत्पन्न व जाहिरातीचे उत्पन्न ही परस्परावलंबी आहेत, याचे कारण असे, की जाहिरातदारांच्या दृष्टीने नियतकालिकांचा वाचकवर्ग म्हणजे आपल्या मालासाठी एक बाजारपेठच असते. वाचकवर्ग जितका विस्तृत तितकीच त्यांची बाजारपेठही मोठी. वाढत्या वाचकवर्गाच्या नियतकालिकांना अधिक जाहिराती मिळतात, एवढेच नव्हे, तर त्या अधिक दरानेही मिळण्याची शक्यता असते, म्हणूनच आपल्या खपाचे आकडे नियतकालिके वारंवार प्रसिद्ध करीत असतात. संपन्न देशांतील नियतकालिकांच्या अर्थव्यवस्थेत जाहिरातींचे स्थान व प्रभावही मोठा आहे. त्यांच्या एकूण उत्पन्नाचा किमान निम्मा व अनेकदा ७५ ते ८० टक्के हिस्सा जाहिरातींपासून मिळवलेला असतो. मराठी नियतकालिकांच्या व्यवस्थापनेत गेल्या अर्धशतकापासून मूलगामी फरक होऊ लागला आहे. आरंभी नियतकालिकांचा प्रपंच एकेका व्यक्तीवर, कधी संपादकावर, तर कधी व्यवस्थापकांवर अवलंबून असे. वैयक्तिक कर्तुत्वाचे महत्त्व आता संपुष्टात येत चालले असे नव्हे; पण संपादनकौशल्याला भांडवलाची व व्यवस्थापकीय कौशल्याची जोड ज्या प्रमाणात लाभेल, त्यावर नियतकालिकाची आयुर्मर्यादा अवलंबून असते, ही अनुभवजन्य जाणीव आता रूजली आहे. आपल्या संपादनाखाली निघणाऱ्या नियतकालिकाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य त्या प्रतिष्ठित लेखकांकडून सातत्याने साहित्य मिळविणे नव्या लेखकांच्या शोधात राहून त्यांचे साहित्य मिळविणे, आपल्या उद्दिष्टाला पूरक असे नवे नवे विषय शोधणे, हाती आलेल्या लिखाणाचा यथोचित परामर्ष घेणे ही अनेकांगी संपादकीय जबाबदारी यशस्वी रीतीने पार पाडावयाची असेल, तर संपादकीय सूत्रे एकापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये विभागून संपादकमंडळ स्थापण्याची आवश्यकता भासू लागली आहे. संपादकीय व्यवसायाचे शास्त्रीय शिक्षण मिळण्याची सोयही आता भारतातील काही विद्यापीठांतून झालेली आहे. या अभ्यासक्रमात वृत्तपत्रकारांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले गेले असले, तरी समाजाशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माध्यमांचा त्यात अंतर्भाव केला असल्यामुळे नियतकालिकांच्या संपादनालासुद्धा हे शिक्षण उपयुक्त ठरू शकते. व्यवस्थापकीय कामकाजाचीही तीच अवस्था आहे. प्रसिद्धीचा वक्तशीरपणा, अंकाची अंतर्बाह्य सजावट, वर्गणीदार व जहिरातदार यांच्या वाढीचे प्रयत्न यांपैकी कशातही कुचराई झाली, तर वाढत्या स्पर्धेच्या जगात निभाव लागणार नाही, हे उमजून सामूहिक व्यवस्थापना अमलात येऊ लागली.
भारतातील समग्र नियतकालिकांची शासनप्रणीत खानेसुमारी १९५७ सालापासून दरवर्षी मिळू लागली आहे. रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया यांच्या द प्रेस इन इंडिया या वर्षिक अहवालात विद्यमान नियतकालिकांची तपशीलवार सूची आणि विविध दृष्टिकोनातून केलेली वर्गीकृत आकडेवारी मिळते. त्यांच्या १९७४ सालच्या अहवालातून भारतीय नियतकालिकसृष्टीच्या रूपरेषा प्रतीत होतात. १९६९-७४ या पाच वर्षांत नियतकालिकांच्या आणि त्यांच्या खपाच्या संख्येत चढउतार आढळत असला, तरी त्यांत अनुक्रमे १७.९% आणि २३.८% वाढ झालेली आहे. एकूण नियतकालिकांत मासिके सर्वाधिक (३९.७%) आणि साप्ताहिके व पाक्षिके त्यांच्या खालोखाल (अनुक्रमे ३२.५ आणि १२.५%) आहेत. हिंदी ही बहुसंख्यकांची भाषा असल्यामुळे हिंदी नियतकालिकांची संख्या आणि खप (अनुक्रमे २,९१८ व ५,६४,९००) अग्रक्रमवार आहेत, हे स्वाभाविकच आहे; पण १९७३ साली या दोन्ही बाबतींत इंग्रजी अग्रेसर होती आणि इतर कोणत्याही प्रांतिक भाषेपेक्षा इंग्रजीत दुपटीहून अधिक संख्येने नियतकालिके प्रसिद्ध होतात आणि त्यापेक्षाही अधिक प्रमाणात खपतात, ही परिस्थिती त्या भाषेच्या भारतातील भवितव्याच्या संदर्भात बोलकी आहे. इतर दृष्टिकोनातून इंग्रजीचे वर्चस्वच आढळून येते. ज्यांच्या प्रत्येक अंकाचा खप १ लक्ष प्रतींपेक्षा अधिक आहे, अशा २५ नियतकालकांमध्ये इंग्रजी नियतकालिके सर्वाधिक (८) आहेत आणि विषयांनुसार केलेल्या वर्गीकरणात २१ विषयांपैकी १४ विषयांत सर्वांत अधिक खप इंग्रजी नियतकालिकांचाच आहे. नियतकालिकप्रकाशनात महाराष्ट्र अखिल भारतात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात १,६१८ नियतकालिके प्रसिद्ध होतात आणि त्यांचा एकूण खप ४७,९६,००० प्रतींचा आहे.


ज्यांच्या दरेक अंकाच्या १ लक्षाहून अधिक प्रती खपतात अशा सर्वच नियतकालिकांचा हेतू फावल्या वेळात मनोरंजन करणे हा दिसतो. लोकशिक्षण, समाजप्रबोधन हे आपले प्रयोजन मानून त्यासाठी विचारप्रवर्तक, कसदार लेखन प्रसिद्ध करणारी गंभीर प्रकृतीची नियतकालिके कोठल्याही भाषेत तुलनेने अल्पसंख्यच आढळतात; कारण त्यांचा वाचकवर्ग फार मर्यादित असतो. मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या ६३० नियतकालिकांच्या संदर्भात हीच परिस्थीती आहे, असे समजण्यात काही प्रत्यवाय नसावा. श्रेष्ठ दर्जाच्या मजकुराच्या मागणीचे दडपण वाचकांकडून नसल्यामुळे हिणकस मजकुरांनी भरलेली नियतकालिके निघतात व जगतात. ही परिस्थिती मागणी तसा पुरवठा या न्यायाचे द्योतक आहे हे खरे, पण समाजशिक्षणाचे आणि समाजाच्या सदभिरुचीचे संवर्धन करण्याचे एक प्रभावी माध्यम या दृष्टीने नियतकालिकांचा विचार केला, तर सद्य:स्थिती काहीशी असमाधानकारक आहे, असा अभिप्राय समीक्षणवाड्‌मयातून प्रतीत होतो.

नियतकालिके

नियतकालिके

जे प्रकाशन एकाच शीर्षकाखाली किमान एक आठवड्याच्या किंवा त्याहून अधिक कालावधीने सामान्यत: नियमितपणे प्रसिद्ध होते आणि ज्यात अनेक लेखकांचे विविध विषयांवरचे (किंवा प्रकाशन विशिष्ट विषयाला वाहिलेले असल्यास त्या एकाच विषयावरचे) साहित्य संकलित केलेले असते ते नियतकालिक, अशी सर्वसाधारणपणे नियतकालिकाची व्याख्या करता येईल. दैनिक वृत्तपत्रांचा अंतर्भाव सामान्यत: या संज्ञेत करीत नाहीत. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या विविध घटनांच्या बातम्या ताबडतोब पुरविणे, हा वृत्तपंत्राचा मुख्य हेतू असतो; तेव्हा वृत्तपत्राप्रमाणे बातम्या न पुरविता मनोरंजक वा ज्ञानवर्धक मजकूर जी प्रकाशने नियमित कालावधीने पुरवितात, त्यांनाच नियतकालिक ही संज्ञा आहे. नियतकालिकांचे वर्गीकरण अनेक दृष्टिकोनांतून करता येते. प्रसिद्धीच्या नियतकालानुसार साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक आणि वार्षिक असे नियतकालिकांचे प्रकार होऊ शकतात. मुलांची, स्त्रियांची अशी विशिष्ट वाचकवर्गानुरूप किंवा मनोरंजक, वैचारिक, संशोधनात्मक अशी आशयानुरूप वर्गावारीही करता येते.

नियतकालिक या वाड्‌यप्रकाराचा उदय युरोप खंडात सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. १६६३ साली जर्मनीत हँबर्गला प्रसिद्ध झालेले Erbauliche Monaths-Unterre-dungen हे जगातील पहिले ज्ञात नियतकालिक समजले जाते. पुढील दोनचार वर्षांच्या अवधीतच फ्रान्स, इंग्लंड आणि इटली या देशांत नियतकालिक निघू लागली. या सर्वांची प्रेरणा ज्ञानप्रसार हीच एक होती. यानंतर १० वर्षांनी फ्रान्समध्ये नियतकालिकांतून रंजक स्वरुपाचा मजकूर समाविष्ट होण्यास सुरुवात झाली. १६७२ साली Mercure gallant या नियतकालिकात आख्यायिका, कविता अशा तऱ्हेचे साहित्य संगृहित केले जाऊ लागले. यथाकाल त्याच अनुकरण होऊन यूरोपमधील इतर देशांतही त्याच धर्तीवर नियतकालिके निघू लागली. १६९० साली इंग्लडमध्ये जॉन डंटन हा प्रकाशक अथेनिअन मर्क्युरी हे रंजक नियतकालिक प्रकाशित करु लागला. स्त्रीवर्गातील वाढता शिक्षणप्रसार ध्यानात घेऊन या मासिकाचे काही अंक त्याने खास स्त्रीवाचकांसाठी प्रसिद्ध केले. त्या प्रयोगाला अपेक्षेपेक्षाही अधिक अनुकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे १६९३ साली त्याने लेडीज मर्क्युरी या नावाचे स्वतंत्र नियतकालिक स्त्रियांसाठी सुरू केले. स्त्रियांसाठी निघणाऱ्या नियतकालिकांचा हा आद्य अवतार समजता येईल.

अठराव्या शतकाच्या आरंभी निबंध या वाड्‌मयप्रकाराचा उदय व विकास होण्यास नियतकालिकाचे माध्यम फार उपयुक्त ठऱले. रिव्ह्यू, टॅटलर, स्पेक्टॅटर इ. नियतकालिकांतून डॅन्येल डीफो, रिचर्ड स्टील व जोसेफ ॲडिसन या तीन निबंधकारांनी इंग्लंडमध्ये लक्षणीय सामाजिक आणि राजकीय जागृती घडवून आणली. त्याबरोबरच आपल्या भाषाशैलीने अभिजात वाङमयाविषयी अभिरुचीही सर्वसामान्य लोकांत निर्माण केली. याच शतकाच्या अखेरच्या दशकात जर्मनीत केवळ वाड्‌मयीन विषयांना वाहिलेली नियतकालिके प्रथम निघाली. शिलर व गटे या विश्वविख्यात साहित्यिकांनी संपादन केलेली वाड्‌मयीन नियतकालिके जर्मन साहित्यात अत्यंत प्रभावी ठरली.

अमेरिकेत नियतकालिकांचा आरंभ १७४१ च्या सुमारास झाला व या अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत तेथे सु. १०० नियतकालिके सुरू झाली. पुढे अमेरिकन नियतकालिकांची जी भरभराट झाली, ती देशातील तत्कालीन सर्वांगीन प्रगतीचा एक भागच समजता येईल. एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण अमेरिकेत बहुतेक सर्व घटक राज्यांतून सुरू झाले. त्याचा परिणाम नियतकालकांसाठी एक मोठा वाचकवर्ग निर्माण होण्यात झाला. त्या काळात जी वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगती झाली तीसुद्धा नियतकालिकांच्या प्रसाराला फार उपयुक्त ठरली. मुद्रणकलेत झालेल्या तांत्रिक सुधारणांमुळे छपाईच्या खर्चात बचत होऊ लागली. कागदाचे उत्पादन मुबलक होऊन तो स्वस्त दराने मिळू लागला. करमणूक आणि ज्ञानवंर्धन या क्षेत्रातील नियतकालिकांची परिणामकारकता जाणून १८७९ सालापासून टपालाच्या दरात त्यांना खास सवलत दिली गेली. या सर्वांचा परिणाम नियतकालिके बहुजनसमाजाला परवडण्याइतकी स्वस्त होण्यात झाला. त्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि त्यांचा प्रसार समाजामधील सर्व थरांपर्यंत पोहोचला.

एकोणिसाव्या शतकात ज्ञानाची अपूर्व प्रगती होऊन त्याच्या नव्या नव्या शाखोपशाखा विकसित झाल्या. विविध विषयांच्या अभ्यासकांनी आणि संशोधकांनी आपापल्या विषयांच्या संवर्धनासाठी विद्वतपरिषदा आणि संघटना स्थापन करून विशिष्ट विषयाला वाहिलेली नियतकालिके प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. नवविचारप्रवर्तक आणि व्यासंगपूर्ण साहित्यासाठी आज जगन्मान्य झालेल्या नेचर, लॅन्सेट, ब्रिटिश मेडिकल जर्नल, जर्नल ऑफ द रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी, इकॉनॉमिक जर्नल या इंग्लंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या आणि पॉप्युलर सायन्स मंथली, सायंटिफिक अमेरिकन, अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू, पॉलिटिकल सायन्स क्कॉर्टर्ली, नॅशनल जिओग्राफिक जर्नल, देदलस या अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांची सुरुवात याच काळातील आहे.

विसाव्या शतकात नियतकालिकांचे काही अभिनव प्रकार अमेरिकेत सुरु झाले. विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण जागतिक घटनांची बातमी समयोचित छायाचित्रांसह पुरविणारे टाइम मॅगझिन हे साप्ताहिक १९२३ साली प्रसिद्ध होऊ लागले आणि वृत्तनियतकालिक या एका नव्या प्रकाराचा नियतकालिकसृष्टित उदय झाला. या साप्ताहिकाला सुरुवातीपासून मिळालेले भरघोस यश पाहून त्याचे अनुकरण होणे स्वाभाविकच होते. अल्पावधीत अमेरिकेत टाइमच्याच धर्तीवर न्यूजवीक, यू. एस. अँड वर्ल्ड रिपोर्ट ही साप्ताहिके निघू लागली. आपले कुशल बातमीदार आणि छायाचित्रकार जगभर नेमून त्यांच्याकरवी मिळालेल्या सामग्रीवर आपल्या खास भाषाशैलीचा संपादकीय संस्कार करून बातम्या गोष्टसदृश स्वरुपात सादर करणे, हे या नियतकालिकांचे वैशिष्ट्ये आहे. फ्रान्समधील L'Express, जर्मनीतील Der spiegel, इटलीतील Panorama व मेक्सिकोतील Tiempo ही या प्रकारातील इतर नावाजलेली नियतकालिके आहेत. वृत्तनियतकालिकांतील टाइमचे अद्वितीयत्व आजतागायत अबाधित आहे. निरनिराळ्या देशांसाठी त्याच्या २०० स्वतंत्र आवृत्त प्रसिद्ध होतात आणि त्यांचा एकूण खप ५५ लक्ष प्रतींचा आहे.

लेखी मजकुरांपेक्षा छायाचित्रांना अधिक प्राधान्य देऊन छायाचित्रांतून घडलेला प्रसंग जणू प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान वाचकांना देणाऱ्या छायाचित्र-नियतकालिकांचा प्रारंभ लाइफ या साप्ताहिकाने १९३६ साली केला. जगातील लक्षवेधक प्रसंगांची कलात्मदृष्ट्या उत्तम आणि अत्यंत परिणामकारक छायाचित्रे प्रसिद्ध करून या साप्ताहिकाने, आर्थिक अडचणींमुळे ते १९७३ साली बंद पडेपर्यंत, नियतकालिकसृष्टीत एक अनन्यसाधारण स्थान मिळविले होते. विद्यमान छायाचित्र प्रसिद्ध करून या साप्ताहिकाने, आर्थिक अडचणींमुळे ते १९७३ साली बंद पडेपर्यंत, नियतकालिकसृष्टित एक अनन्यसाधारण स्थान मिळविले होते. विद्यामान छायाचित्रनियतकालिकांत फान्समधील Paris-Match, जर्मनीतील Stern व इटलीतील Oggi ही श्रेष्ठ दर्जाची समजली जातात. निरनिराळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले विविध विषयांवरील निवडक लेख संक्षिप्त करुन एकत्र छापण्याचा उपक्रम अमेरिकेत लिटररी डायजेस्ट आणि रिव्ह्यू ऑफ रिव्ह्यूज या नियतकालिकांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुरू केला होता; पण या कल्पनेची खरी परिपूर्ती १९२२ साली रीडर्स डायजेस्ट नियतकालिकाच्या सुरूवातीने झाली. प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीनुरूप प्रत्येक अंकात भरपूर साहित्य मिळाल्याचे समाधान होईल, अशा योजकतेने संक्षेपासाठी लेख निवडणे हे त्याच्या अभूतपूर्व लोकप्रियतेचे मर्म दिसते. करमणूक, ज्ञान, बहुश्रुतता यांसाठी उत्सुक असलेल्या वाचकवर्गावर याचा इतका पगडा पडला, की अवघ्या वीस वर्षांत अनेक देशांत आणि अनेक भाषांत त्याच्या स्वतंत्र आवृत्त्या निघू लागल्या. भारतातही त्याची स्वतंत्र आवृत्ती सुरू झालेली आहे (१९५४). त्याच्या इतर १३ आवृत्त्या निघतात आणि त्यांचा एकूण खप ३ कोटींच्या आसपास आहे. नियतकालिकसृष्टित हा विक्रम अभूतपर्व आहे.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...