Sunday, 22 September 2013

डॉ.भीमराव रामजी आंबेडकर


जन्म- १४ एप्रिल, १८९१ (महू, मध्य प्रदेश)

मृत्यू- ६ डिसेंबर, १९५६ (दिल्ली)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान निर्विवाद आहे. बाबासाहेबांचा जन्म १४ एपिल १८९१ रोजी महु या गावी एका अस्पृश्य कुटुंबात झाला. अस्पृश्य कुटुंबात जन्मल्यामुळे लहान वयापासून अन्यायकारक प्रथेचा अनुभव येत गेला. त्यांचे वडिल लष्करात सुभेदार मेजर होते, भीमराव आंबेडकरांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन हायस्कूल व महाविद्यालयात झाले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानात नोकरी पत्करली. पण तिथे सुद्धा पदोपदी जातीच्या नावाखाली हेटाळणी होत असे. याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी ती नोकरी सोडून, मुंबईतल्या सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यपकाची नोकरी स्वीकारली.

अन्याया विरुद्ध आवाज उठवून, अस्पृश्यांचा उद्धार हेच त्यांनी आपले जिवीत कार्य मानले. त्यासाठी आंबेडकरांनी अस्पृश्य कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरुवात केली. १९१९ पासून त्यांचा सार्वजनिक जीवनात वावर सुरु झाला आणि अस्पृश्य समाजाच्या जागृतीचं आणि संघटनाचं कार्य करुन ते दलितांचे नेते म्हणून ही ओळखले जाऊ लागले.१९२० मध्ये त्यांनी मुंबई येथून “मूकनायक” नावाचे पाक्षिक सुरु केले. त्याच वर्षी कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची माणगांव येथे परिषद आयोजित केली. तर नागपूरला छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली आखिल भारतीय परिषद ही बोलावली, लोकजागृतीचं कार्य सुरु असतानाच स्वत:चे अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याकरिता ते इंग्लंडला गेले. आणि लंडन विद्यापीठाची डी.एस.सी. ही दुर्लभ पदवी संपादन करुन बॅरिस्टर झाले.

१९२४ मध्ये त्यांनी “बहिष्कृत हितकारिणी” ही संस्था स्थापन केली. “शिकवा, चेतवा व संघटित करा”हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर सर्वसामान्यांप्रमाणे अस्पृश्यांनाही पाणी भरता यावे यासाठी त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व त्याच वर्षी अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी “मनुस्मृती” आणली.

अस्पृश्यांना इतर भक्तांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे यासाठी १९३० साली. काळाराम मंदीर प्रवेशासाठी सत्याग्रह ही केला, त्याचं नेतृत्व त्यांनी स्वत: केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते, तिथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू अगदी हिरहिरीने मांडली; त्यांची स्वतंत्र मतदार संघांची मागणी ही मंजूर झाली. पण यामुळे म.गांधी आणि डॉ. आंबेडकर मध्ये मतभेद निर्माण झाले, त्यामुळे गांधीजींनी उपोषण आरंभले.

१९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. प्रांतिक विधीमंडळाच्या झालेल्या निवडणूकीमध्ये ते प्रचंड बहुमतांनी निवडून आले.

१९४१ साली त्यांनी “ऑलइंडिया शेड्युलकास्ट फेडरेशन” नावाच्या देशव्यापी पक्षाची स्थापना करुन, अस्पृश्यांसाठी अनेक लढे ही दिले. तसंच अन्याय ग्रस्त समाज घटकांचं एक व्यापक पक्ष म्हणून स्थापना करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता. त्याचं नाव “रिपब्लिकन पक्ष” असं ठरवण्यात आलं होतं, पण या पक्षाची स्थापना बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर म्हणजे १९५७ साली करण्यात आली.

१९४२ ते १९४६ या कालखंडात बाबासाहेब व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते, भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधी मंत्री झाले. भारतीय राज्यघटनेच्या निमिर्ती मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, सोबतच ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, अथक परिश्रम पणाला लावुन त्यांनी संविधनाचा मसुदा तयार केला होता, म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे आदिशिल्पकार मानण्यात आलं आहे.

वाचन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यासंग होता. ग्रंथाशिवाय आपण जगूच शकणार नाही असे त्यांना वाटे. त्यांच्याकडे दुर्मिळ अशा २५ हजार ग्रंथांचा संग्रह होता, बाबासाहेबांनी लिहिलेले अनेक ग्रंथ ही विचार प्रेरक आहेत.

आंबेडकरांच्या व्यासंगाचे व संशोधनकुशलतेचे प्तीक असलेला ग्रंथ म्हणजे “हु वेअर शुद्राज” तर त्यांचे “द अनटचेबल्स” या नावाचे पुस्तक ही उल्लेखनीय आहे. जातीय संस्थेमुळे हिंदूधर्म पोखरला गेला आहे, अशी बाबासाहेबांची ठाम समजूत होती. धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यांवरील त्रास व अन्याय दूर होणार नाही, अशी पक्की धारणा झाल्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या अनेक अनुयायांसह नागपूर येथे बौध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर बौध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीचे कार्य हाती घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तसंच राजकीय आणि सामाजिक चळवळींनी प्रचंड क्रांतिकारी कार्य ही केले. त्यामुळेच शतकानुशतके मुक असणार्‍या एका मोठ्या समुदायाला बाबासाहेबांच्या रुपाने वाचा मिळाली.

भारताचे एक द्रष्ट नेते, श्रेष्ठ कायदेपंडित, तळा गळातील जनतेचा नेता आणि “एक विद्वान महामानव” अशा अनेक रुपांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची किर्ती आणि स्मृती चिरंतन रहाणार आहेत. ६ डिसेंबर १९५६ ला त्यांच महानिर्वाण झालं, त्यानंतर भारताचं सर्वोच्च असा “भारत रत्न” हा सन्मान मरणोत्तर बहाल करण्यात आला.

प्रकाश गोपाळराव पोहरे


महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्‍या `दैनिक देशोन्नती' या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक.

`दैनिक देशोन्नती' हे महाराष्ट्रातील ५ व्या क्रमांकाचे तर विदर्भातील दुसर्‍या क्रमांकाचे दैनिक आहे. याचबरोबर त्यांनी कमी खर्चाच्या शास्वत शेतीला वाहिलेले `साप्ताहिक कृषकोन्नती' सुरु केले असून शेती या विषयावर हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे साप्ताहिक आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी सुरु केलेले हिंदी दैनिक `राष्ट्रप्रकाश' हे मराठी संपादक/मालकाचे पहिलेच हिंदी दैनिक आहे. श्री प्रकाश पोहरे यांचा जन्म दि. १७ मार्च १९५४ रोजी अकोला येथे झाला. १९८० ते १९९४ ही तब्बल १४ वर्षे ते शेतकरी संघटनेमध्ये अत्यंत सक्रियरित्या सहभागी होते. या काळात त्यांनी राज्यात अनेक सभा व आंदोलने गाजवली. १९९३ मध्ये त्यांनी कापूस सीमापार या आंदोलनाचे नेतृत्तव केले. परिणामी कापसाला २४०० रुपये भाव मिळाला.

`प्रहार' हा त्यांचा स्तंभ फार लोकप्रिय असून त्यातील लेखांचे संकलन एकूण चार पुस्तकांतून केले गेले आहे. त्यांची एकूण ९ पुस्तके प्रकाशित झाली असून दैनिक देशोन्नतीमधील १९९४ ते २०१० या १६ वर्षातील निवडक अग्रलेखांचे १० खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या सर्व पुस्तकांच्या मिळून जवळपास ५०००० प्रतिंची विक्री झाली आहे. श्री प्रकाश पोहरे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यांना पत्रकारीतेतील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. श्री प्रकाश पोहरे यांच्याविषयी अधिक माहितीसाठी त्यांच्या http://www.prakashpohare.com या साईटला भेट द्या . `प्रहार' या स्तंभातील निवडक लेख मराठीसृष्टीच्या `लेखसंग्रह' या विबागात उपलब्ध आहेत.

पराग करंदीकर

पराग करंदीकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व प्रथितयश पत्रकार असून महाराष्ट्र टाईम्स, सकाळसारख्या नामांकित व पुणे-मुंबईसारख्या महानगरांमधील नागरिकांचे मतप्रवाह ठरविणार्‍या वृत्तपत्रांसाठी वृत्तसंकलनाचे काम करून त्यांनी या क्षेत्रातील विपुल अनुभव गाठीशी जमविलेला आहे. सध्या महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रासाठी निवसी पत्रकाराचे काम करताना ते बेनेट कोलमॅन अँड कंपनीमध्ये कार्यरत असुन आपल्या आभ्यासपुर्ण लेखनाचा व
अचुक माहिती संकलनाचा सुरेख संगम करीत त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा अगदी ठसठशीत ठसा त्यांनी येथे उमटविला आहे. करंदीकरांचे शैक्षणिक आलेख बघितला, तरी त्यांच्या आतील अष्टपैलु व सृजनशील विद्यार्थ्याची सहज प्रचिती येईल, इतक्या विभीन्न प्रातांना व पाउलवाटांना एक विद्यार्थी म्हणून चोखंदळले आहे. 'डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरींग' हा कोर्स करून एका इंजिनीअराची प्राथमिक घडण, आर्टस क्षेत्राती राज्यशास्त्र या विषयातील पदवी मिळविलेला पदवीधर, व रानडे इन्स्टिट्युट मधून 'मास्टर्स इन जर्नालिसम अँड कम्युनिकेशन' ही पत्रकारिता कौशल्यांना सबळ व सक्षम करणारी डिग्री मिळविणारा तज्ञ, अशी एक विद्यार्थी म्हणूनच त्यांची मुळे फार खोलवर रूतलेली आहेत. कस्रो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रथितयश संस्थेमधून ते डिप्लोमा इंजिनीअर झाले तर परशुराम भाऊ कॉलेज पुणे या नामांकित कॉलेजमधून कला क्षेत्रातील पदवीधर झाले .त्यांच्यातील खर्‍या पत्रकाराची जडण घडण तर कॉलेजच्या दिवसांपासूनच झाली. पत्रकारिता हे त्यांच व्रत आहे, अन्यायाला तोंड फोडण्यासाठी त्यांनी निवडलेलं शस्त्र आहे हे त्यांच्या आतापर्यंतच्या अत्यंत तत्पर व पारदर्शी वाटचालीमधून सिध्द होतं आलयं. कॉलेजच्या दिवसांपासून त्यांच्या हाताला चिकटलेली लेखणी आजवर कधीही म्यानस्थ झ ालेली नाही. उलट ती आजच्या आव्हानात्मक व भ्रष्टाचाराने वेढलेल्या जगामध्ये अधिकच तावून सुलाखून निघालेली आहे. निर्भीड विचारसणीचे व विज्ञानवादी दृष्टीकोनाचे पुरस्कर्ते असलेल्या करंदीकरांनी साहाय्यकारी संपादक पुणे शहर, सकाळ मिडिया ग्रुप येथे, सकाळ पेपर्स लिमीटेड साठी अहवालकर्ता म्हणून, तर सकाळसाठीच क्रिडा विभागाचे उपसंपादक व प्रमुख रिपोर्टर म्हणून काम केले आहे. आपले पदव्योत्तर शिक्षण त्यांनी एन. एम. व्ही. कॉलेजमधुन पुर्ण केले.

दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर

जन्म - १ डिसेंबर १८८५ ,
मृत्यू - २१ ऑगस्ट १९८१

दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, उर्फ आचार्य कालेलकर उर्फ काकासाहेब कालेलकर; हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक, इतिहासकर, शिक्षण तज्ञ, पत्रकार, साहित्यिक तसंच भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक तथा गांधीवादी म्हणून परिचित आहे.

काकासाहेब कालेलकरांचा जन्म १ डिसेंबर १८८५ साली सावंतवाडीच्या बेलगुंडी या गावी झाला.फर्ग्युसन महाविद्यालयातुन शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांनी “राष्ट्रमत” या दैनिकात संपादकीय विभागात काम केलं. त्यानंतर बडोदा येथील गंगाधर विद्यालयात कालेलकर शिक्षक म्हणून रुजू झाले, पण “या विद्यालयात सरकार विरोधी कारवाया चालतात” असे कारण दाखवून ब्रिटीश सरकारने हे विद्यालय बळजबरीने बंद केले.
“गंगाधर विद्यालय” बंद झाल्यावर काकासाहेबांनी महात्मा गांधीजींच्या गुजराथ येथील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी “सर्वोदय” या महात्मा गांधीजींच्या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिलं. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी मोलाचं योगदान बजावलं, त्यासाठी हिंदुस्थानी प्रचार सभेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवला. भारत देशाचं ऐक्य टिकून रहाण्यासाठी हिंदी भाषेच्या प्रचाराची नितांत आवशक्यता असल्याचं ते मानत, त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण ही केले. 
महात्मा गांधीजींच्या प्रेरणेमुळे साकारलेल्या गुजराथ विद्यापिठाच्या स्थापनेत काकासाहेब कालेलकरांनी महत्वाची भूमिका पार पाडली. काही काळ कालेलकर गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरु ही होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे १९५३ साली “मागास वर्गीय आयोग” नेमण्यात आला होता, काकासाहेब कालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते. १९५५ ला या आयोगाने आपला अहवाल सरकारला केला. या अहवालात दलित तसंच अस्पृश्यांसाठी अ नेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती.

काकासाहेब कालेलकरांनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती जनतेने सुद्धा त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले, कालेलकरांना गुजराती लोकं आदराने “सवाई गुजराती” म्हणत असत. काकासाहेब कालेलकरांनी लेखन आणि शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने १९६४ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले, तर कालेलकरांच्या साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामासाठी १९६६ साली “जीवन व्यवस्था” या गुजराती भाषेतील निबंध संग्रह साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. तर १९७१ साली “साहित्य अकादमीचे सदस्यत्व” ही बहाल करण्यात आले. २१ ऑगस्ट १९८१ साली वयाच्या ९६ व्या वर्षी काकासाहेब कालेलकरांच वृद्धापकाळाने निधन झाले.

हेमंत देसाई

हेमंत देसाई हे गेली जवळपास ३६ वर्षं पत्रकारितेत आहेत. मराठी दैनिकात आर्थिक पत्रकारितेचा अध्याय सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ज्येष्ठ सहायक संपादक म्हणून, तसंच महाराष्ट्र टाइम्स मध्ये एकूण २६ वर्षं काम केले. या काळात सदर वृत्तपत्राच्या जडणघडणीत महत्त्वाचा योगदान असून अग्रलेख, वैचारिक लेखनशैलीसाठी ख्याती आहे.
त्याचप्रमाणे लोकमत,सकाळ, महानगर, प्रभात, नवशक्ति, महानगर सारख्या वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन ही केलेलं आहे.तर साधना साप्ताहिकात चार वर्षे सदर व अग्रलेखही लिहिले. तसेच बाबू मोशाय या टोपणनावाने चित्रपटविषयक लिखाण. संशोधन, अभ्यासू वृत्ती हेमंत देसाईंच्या वैशिष्ट्य म्हणता येईल.कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता परखड लेखन व बोलण्यासाठी प्रसिद्ध. आक्रमक व वैचारिकता यांची सांगड घालून लेखन व भाषणे राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्नांवर लेखनाबरेबरच ठिकठिकाणी व्याख्याने. राजकीय व सामाजिक विषयांचे अभ्यासक म्हणून व वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमालांमधून व्याख्याने दिली आहेत यामध्ये पुण्याची वसंत व्याख्यानमाला, संगमनेरची अनंत फंदी, मिरज व गडहिंग्लज येथील वाचनालयांच्या व्याख्यानमाला या व इतर ब-याच ठिकाणी व्याख्याने दिली असून, अनेक टीव्ही चॅनेल्सवरूनही विश्लेषणात्मक चर्चांमधून सहभाग घेतला आहे. बऱ्याच स्वयंसेवी संस्थांशी संबंध. पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीशी जवळचे नाते जोडून काम. विविधांगी लेखनासोबतच कथालेखनही चालू. भोवळ कादंबरीही दिवाळी अंकातून प्रकाशित झाली असून ती पुस्तकरूपात प्रसिध्द झाली आहे. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांसाठी अध्यापन ही केलं असून माध्यम क्षेत्रातील त्यांचे अनेक विद्यार्थी आज महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
सण्डे के सण्डे, बोई बगाल, जलसाघर, तारकांचे गाणे, शहेनशहा अमिताभ, विदूषक, चांदरात ही बाबू मोशायलिखित आणि आपला अर्थसंकल्प, कंगालांचे अर्थशास्त्र व सारथी ही हेमंत देसाई नावाने लिहिलेली पुस्तके प्रकाशित. त्यांचा ‘बोई बंगाल’ या पुस्तकास राज्य वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाला असून,आणखीही काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर. चित्रपटसंगीतविषयक ‘सुहाना सफर’ व राजकीय लेखसंग्रह ‘डावपेच’ प्रसिद्ध झाला आहे.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

जन्म-२५ नोव्हेंबर, १८७२ मृत्यू- २६ ऑगस्ट, १९४८ 
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते. 'केसरी'चे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले.'नवाकाळ' या वृत्तपत्राचे ते संस्थापक आहेत.

बाळशास्त्री जांभेकर

जन्म- ६ जानेवारी, १८१२
मृत्यू- १८ मे, १८४६

बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले.
त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. त्याच जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षे होते. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश सरकारपर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्रजी भाषेत असायचा.वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. दर्पण सुमारे साडेआठ वर्षं नियमितपणे प्रकाशित होत होते. त्याच्या शेवटच्या अंकाचे प्रकाशन जुलै १८४० मध्ये झाले. तत्कालीन सामाजिक समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले जावे, तसेच समाजात जागृती होऊन बालविधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळावी इ. विषयांवर वृत्तपत्रांतील संपादकीय लेखांचा भर असे.
जांभेकरांनी वाचनालयांचे महत्त्व ओळखून 'बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' ची स्थापना केली. मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी १८४० साली सुरू केले होते. 'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. 'एशियाटिक सोसायटी' या त्रैमासिकांत शोध निबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी १८४५ मध्ये काढली होती. मराठी, संस्कृत, इंग्लिश, हिंदी, गुजराथी, कानडी, फारसी बरोबरच ग्रीक व लॅटिन भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन करीत. त्या काळात त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत.
पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे आपला समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवले की, नुसते महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही. संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. श्रीपती शेषाद्री नावाच्या एका मुलाला त्यांनी योग्य रस्ता दाखवला, आणि मग त्यांना असे वाटले की, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र सुरू केले पाहिजे. आणि त्यांनी ’दर्पण’ सुरू केले. मराठीतले ते आद्य पत्रकार. त्यांनी प्रकाशित केलेल्या साहित्यांत 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे. जानेवारी ६ हा 'दर्पण' वृत्तपत्राच्या प्रथम प्रकाशनाचा दिवस (आणि योगायोगाने जांभेकरांचा जन्मदिन) महाराष्ट्रांत 'पत्रकारिता दिवस' म्हणून साजरा होतो. बाळशात्री जांभेकरांवर 'युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर- काळ आणि कर्तृत्व' लेखिका: नीला उपाध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. मराठी भाषेतील पहिले मराठी वृत्तपत्रकार, भाषांतरकार, शिक्षणतज्ज्ञ, गणिततज्ज्ञ, निबंधकार बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांच्या संपादनाखाली ‘दर्पण’चा प्रथम अंक मुंबईत प्रकाशित झाला. त्यांचे वडील व्युत्पन्न पुराणिक होते. त्यामुळे साहजिकच ते भिक्षुकीचा व्यवसाय करत असत. त्यांनी आपल्या मुलास १८२५ च्या दरम्यान मुंबईत बापू छत्रे यांच्याकडे इंग्रजी शिकण्यासाठी पाठवले. दुसर्‍याच वर्षी बाळशास्त्री नेटीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी शाळेत दाखल झाले. पाच वर्षांत तेथील अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी संस्कृत, इंग्रजी व मराठी या भाषांवर प्रभुत्व मिळवले. तसेच गणित व इतिहास या विषयातही प्रावीण्य मिळवले. १८२९ मध्ये एल्फीस्टन हायस्कूलमध्ये त्यांची नेमणूक झाली. १८३४ मध्ये ते असिस्टंट प्रोफेसर बनले. मधल्या काळात अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून त्यांनी २० महिने काम केले. प्राध्यापक अर्लिबार यांच्या हाताखाली गणित-ज्योतिषादी शास्त्रांचा अभ्यास केला. बंगाली, गुजराती, कन्नड, तेलगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन इ. भाषांवर प्रभुत्व मिळवले. प्राचीन लिपीशास्त्राचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख, ताम्रपट यावर शोधनिबंध लिहिले. मुंबईच्या फोर्ट भागातील ज्युनियर कॉलेजच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली. तेथे वाङ्मय व विज्ञान हे विषय ते शिकवत. १८४५ मध्ये सरकारने स्थापन केलेल्या नॉर्मल स्कूलचे ते अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी, केरूनाना छत्रे इ. नामवंत त्यांचे विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांची ज्ञान जिज्ञासा वाढावी म्हणून त्यांनी काही पुस्तकेही लिहिली. ‘नितीकथा’, ‘सारसंग्रह’, ‘इंग्लंड देशाची बखर’, ‘भूगोल विद्या’, ‘गणितभाग’, ‘बालव्याकरण’ इ. तसेच १८४५ मध्ये त्यांनी प्रथमच ज्ञानेश्वरी मुद्रित स्वरूपात वाचकांच्या हाती दि ी. १८३२ मध्ये बाळ शास्त्री यांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठी भाषांमधून सुरू केले. मराठीतील हे पहिले वर्तमानपत्र. मराठीतील या पहिल्या मासिकाचे संपादनही त्यांनीच केले.
विद्वान व बहुआयामी व्यक्तित्त्व असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचे अवघ्या पस्तीसाव्या वर्षी १७ मे १८४६ रोजी निधन झाले.

जनसंपर्क…एक शास्त्रशुद्ध व्यवसाय

जनसंपर्काविषयी अगदीच थोडक्यात सांगायचे झाले तर विविध प्रकारच्या लोकांशी केलेला संपर्क म्हणजे जनसंपर्क. अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्टां...